भाजपमध्ये बंडाचा झेंडा कायम
मिरा-भाईंदरमध्ये ११३ उमेदवारांची माघार
भाईंदर, ता. २ (बातमीदार) : मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीदेखील भाजपमधील बंडखोरी कायम राहिली आहे. बंडखोरी केलेल्या माजी नगरसेवकांपैकी निम्म्याहून अधिक माजी नगरसेवकांनी माघार घेण्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे एकहाती सत्ता स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भाजपची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी एकंदर ११३ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे ९५ जागांसाठी आता ४३५ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी २० माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. या निर्णयाने संतप्त झालेल्या १३ माजी नगरसेवकांनी बंड पुकारत अपक्ष उमेदवारी दाखल केली. या बंडखोरांना थोपवण्याचे मोठे आव्हान पक्षापुढे उभे होते. गुरुवारी (ता. १) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मिरा-भाईंदरमध्ये आले होते. सर्व बंडखोरांची समजूत काढून उमेदवारी मागे घेतली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले होते. खुद्द चव्हाण यांनी काही बंडखोरांशी चर्चा केली, तर स्थानिक पातळीवरील भाजपच्या जिल्हा समितीनेही बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत हे प्रयत्न सुरू होते. मात्र शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपच्या अवघ्या चार माजी नगरसेवकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
ठाम नकार
त्यातही विजय राय या उमेदवारी मागे घेतलेल्या माजी नगरसेवकाने भाजपला रामराम करीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उर्वरित नऊ माजी नगरसेवकांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घेण्यास ठाम नकार देत बंडखोरी कायम ठेवली आहे. या बंडखोरीने भाजपचे गणित बिघडते की बंड अयशस्वी होते, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तर काँग्रेसमधील काही बंडखोरांनीही आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
काँग्रेसच्या उमेदवाराची माघार
भाईंदर पश्चिम येथील प्रभाग ८ मधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार झीनत कुरेशी यांनी सर्वांना धक्का देत आपली उमेदवारी मागे घेतली. या प्रभागात शिवसेना शिंदे गटाने चार जागांपैकी केवळ दोनच जागांवर महिला उमेदवार दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महिला उमेदवाराच्या अचानक माघारीमुळे चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
४३५ उमेदवार
याव्यतिरिक्त मनसेच्या प्रभाग ५ मधील अधिकृत उमेदवाराने उबाठा गटासाठी माघार घेतली, तर उबाठा गटाचे आस्तिक म्हात्रे यांनी प्रभाग १० मधून माघार घेत पक्षालाच धक्का दिला. त्यांची पत्नी शिंदे गटातून निवडणूक लढवत आहे. आता निवडणूक रिंगणात एकंदर ४३५ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. भाजप ८७ , शिवसेना शिंदे गट ८१, राष्ट्रवादी (अजित पवार) ३२, काँग्रेस ३१, शिवसेना (उबाठा) ५६, मनसे ११, राष्ट्रवादी (शरद पवार) १४, वंचित बहुजन आघाडी १५ आणि बविआ एका जागेवर लढत देत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी, बहुरंगी लढती पाहायला मिळणार आहे.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.