कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रोला गती
ओपेक फंडकडून अर्थसहाय्याचे संकेत; १८ हजार कोटींचा प्रकल्प
बदलापूर, ता. ७ (बातमीदार) ः मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्ग क्रमांक १४ (कांजूरमार्ग ते बदलापूर) या प्रकल्पाला आता जागतिक स्तरावर बळ मिळाले आहे. ओपेक फंड फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या संस्थेने या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य करण्यास सकारात्मकता दर्शवली असून, यामुळे बदलापूरकरांच्या मेट्रो प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
ओपेक फंडच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने गुरुवारी (ता. ५) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेतली. या बैठकीत सुमारे १८ हजार कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो १४ प्रकल्पासह ‘मुंबई ३.०’ आणि विविध पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी वित्तपुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ओपेक फंड याआधीही एमएमआरडीएच्या मेट्रो मार्ग क्रमांक पाच (ठाणे-भिवंडी-कल्याण) प्रकल्पासाठी ‘सिस्टम कंपोनंट्स’साठी वित्तपुरवठा भागीदार म्हणून कार्यरत आहे. आता मेट्रो मार्ग १४ सोबतच ‘मुंबई ३.०’ तसेच महत्त्वाच्या पाणीपुरवठा प्रकल्पांमध्येही आर्थिक सहभाग वाढवण्याची तयारी संस्थेने दर्शवली आहे. त्यामुळे रखडलेले व महत्त्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय निधीच्या माध्यमातून वेग घेण्याची शक्यता निर्माण झाली असून राज्य सरकार व एमएमआरडीएवरील आर्थिक ताणही कमी होणार आहे.
मुंबई महानगरातील सर्वाधिक वेगाने विस्तारत असलेले शहर म्हणून बदलापूरची ओळख आहे. मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग वास्तव्यास असलेल्या या शहरातून दररोज लाखो प्रवासी कल्याण, ठाणे, नवी मुंबई व मुंबईकडे जीवघेण्या लोकलगाडीतून प्रवास करतात. एकाच रेल्वे मार्गावर प्रचंड ताण असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. रेल्वेव्यतिरिक्त दीर्घ पल्ल्यासाठी कोणतीही शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने बदलापूर-अंबरनाथ परिसरासाठी मेट्रोची नितांत गरज आहे.
यंदा प्रत्यक्ष कामाला सुरुवात
कांजूरमार्ग ते बदलापूर हा प्रस्तावित मेट्रो मार्ग अंदाजे ३८ ते ४५ किलोमीटर लांबीचा असून त्यावर सुमारे १५ ते २० स्थानके प्रस्तावित आहेत. कांजूरमार्ग, विक्रोळी, लालबहादूर शास्त्री मार्ग, शिळफाटा, महापे, घणसोली, ऐरोली, तुर्भे, दिघा, अंबरनाथ व बदलापूर ही प्रमुख स्थानके असण्याची शक्यता आहे. कांजूरमार्ग येथे भूमिगत स्थानक तसेच ठाणे खाडीखालून बोगद्याद्वारे मेट्रो नेण्याची योजनाही प्रस्तावात समाविष्ट आहे. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल यापूर्वीच मंजूर झाला असून सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास २०२६ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. काही टप्पे २०३० पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून लोकल प्रवासादरम्यान होणारे अपघात व दैनंदिन त्रास कमी होऊन बदलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मेट्रो मार्ग १४ : एका नजरेत
एकूण लांबी : ३८ ते ४५ किलोमीटर
प्रस्तावित स्थानके : १५ ते २० (प्रमुख स्थानके : कांजूरमार्ग, विक्रोळी, शिळफाटा, महापे, ऐरोली, अंबरनाथ आणि बदलापूर)
विशेष वैशिष्ट्य : कांजूरमार्ग येथे भूमिगत स्थानक आणि ठाणे खाडीखालून बोगद्याद्वारे मेट्रो नेण्याची योजना
कामाची सुरुवात : २०२६ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची शक्यता असून, २०३० पर्यंत काही टप्पे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.