मुंबई

Eknath Khadse In BJP Again: ‘सीडी’ची शिडी.... आणि खडसेंची हनुमान उडी

खडसेंना भाजपमध्ये परत आणण्यासाठी विनोद तावडेंनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा आहे|There is talk in political circles that Vinod Tawde played an important role in bringing Khadse back to BJP

सकाळ वृत्तसेवा

विजय चोरमारे ः सकाळ न्यूज नेटवर्क

Maharashtra Political News: भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याची कथित ‘सीडी’ आपल्याकडे असल्याचा दावा करत त्या ‘सीडी’ची शिडी करून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले.

पक्षातील साडेतीन वर्षांच्या वास्तव्यात स्वतःसाठी आमदारकी आणि कन्या रोहिणी यांच्यासाठी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवले आणि आता पुन्हा ते भारतीय जनता पक्षात हनुमान उडी मारत आहेत.

महाराष्ट्रात २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या मंत्रिमंडळात खडसे यांच्याकडे महसूल खात्यासह अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी होती. खडसे हे गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचे महाराष्ट्र भाजपमधील महत्त्वाचे आणि जनाधार असलेले नेते म्हणून ओळखले जात होते.

त्यांना डावलून नवख्या फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिल्यामुळे ते नाराज होते आणि मंत्रिमंडळात असताना ते वारंवार नाराजी व्यक्त करीत होते. त्यातूनच त्यांच्याशी संबंधित वादग्रस्त प्रकरणे पुढे आली आणि त्यात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. चार जून २०१६ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच भाजपमधून ते बाजूला फेकले गेले.

२०१९ला सत्तांतर झाल्यानंतर भाजपमध्ये असताना ते फडणवीस यांच्याविरोधात थेट बोलून आपले राजकीय अस्तित्व दाखवू लागले. भाजपच्या एका बड्या नेत्याची वादग्रस्त ‘सीडी’ आपल्याकडे असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येऊ लागला. भाजपकडून कोणत्याही पातळीवर दखल न घेतल्यामुळे ते पक्ष सोडण्याच्या निर्णयाप्रत पोहोचले.

स्नुषा रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असल्या तरीही त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २३ ऑक्टोबर २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बोलण्यासाठी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसधील एकही नेता धजावत नव्हता. ही उणीव खडसे भरून काढतील, असे पक्षनेतृत्वाला वाटल्यामुळे खडसे यांचे राष्ट्रवादीमध्ये उत्साहाने स्वागत करण्यात आले.

जून २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीवेळी पक्षातील अनेक निष्ठावंत नेत्यांना डावलून खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामागे विधिमंडळात फडणवीस यांच्याशी सामना करण्यासाठीची त्यांची उपयुक्तता हाच उद्देश होता. विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात समावेशाचीही योजना होती. परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशीच एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह सुरतला पलायन केले आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यामुळे त्यांना ती संधी मिळाली नाही. दरम्यानच्या काळात खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन खडसे कुटुंबीयांचा योग्य तो सन्मान केला. खानदेशातीलच आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका आक्रमक आणि जनाधार असलेल्या कार्यकर्तीला डावलून रोहिणी खडसे यांना संधी देण्यात आली.

परंतु जसा खडसे यांचा पक्षाला काही उपयोग झाला नाही, तसाच रोहिणी खडसे यांचाही पक्षाला काही उपयोग झाला नसल्याचे पक्षातील नेते, कार्यकर्त्यांचे मत आहे. विद्या चव्हाण या महिला प्रदेशाध्यक्ष असताना वयाच्या मर्यादा असतानाही त्यांनी राज्यभर दौरा काढून पक्षसंघटना सक्रिय करण्याचा प्रयत्न केला होता. रोहिणी खडसे यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी मुंबई आणि रावेरच्या पलीकडे फारसे काही पाहिले नसल्याचे पक्षातील लोकांचे म्हणणे आहे. आता एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर रोहिणी खडसे यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु वडिलांसोबत सावलीसारख्या वावरणाऱ्या रोहिणी खडसे पक्षाचे काम कसे करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाविकास आघाडीत वाटाघाटी करताना केवळ खडसे यांच्यासाठी शरद पवार यांनी रावेर मतदारसंघ आपल्या पक्षासाठी मागून घेतला. मात्र रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि राष्ट्रवादीवर उमेदवार शोधाशोध करण्याची नामुष्की आली. आता खडसे भाजपमध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादीची रावेरमधील अवस्था अगदीच नाजूक बनली आहे.

Eknath Khadse

भाजपमध्ये परतीचे संकेत

मुक्ताईनगर तालुक्यातील गौणखनिज प्रकरणी खडसे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना १३७ कोटींची दंड करण्यात आला होता, तो सरकारने रद्द केला. रक्षा खडसे यांच्याविरोधात लढणार नसल्याची एकनाथ खडसे यांनी घोषणा केली. आणि मधल्या काळात त्यांचा

दिल्ली दौरा झाला. या सगळ्या घटना खडसे यांच्या भाजपमध्ये पुन्हा परतण्याच्या प्रक्रियेतील एकेक पायरी असल्याचे मानण्यात येते.

तावडे यांची भूमिका महत्त्वाची

खडसे यांनी भाजपमध्ये परत येण्यासाठी भाजपकडून दबाव वाढत असल्याचे ‘राष्ट्रवादी’च्या एका बड्या नेत्याने सांगितले. गेल्या महिन्यात दोन वेळा आपल्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आल्याचे खडसे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितले होते. भाजपमध्ये परतण्यासाठी ते त्यावेळी पार्श्वभूमी तयार करीत असल्याचेच त्यावरून स्पष्ट होते. खडसे यांना भाजपमध्ये परत आणण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

खडसे यांचा अलीकडचा राजकीय प्रवास

४ जून २०१६ - मंत्रिपदाचा राजीनामा

२३ ऑक्टोबर २०२० - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

२० जून रोजी २२ - विधान परिषदेवर निवड

१० मार्च २०२३ - राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील गटनेतेपदी नियुक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT