नांदेड : खरीप हंगाम जवळ आल्याने जिल्ह्यात कृषिविषयक आस्थापनांना सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यामध्ये दिली. या साठी कृषी विभागाने संबधीत कृषी निविष्ठा चालकांना नांदेड उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे ओळखपत्र देण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे कृषी व्यवसायिक एन हंगामात अडचणीत सापडले आहेत.
लॉकडाउनमुळे कृषी सेवा केंद्र बंद
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात शासनाने लागू केलेल्या लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र, ठिबक व तुषार एजन्सी, मशिनरी दुकान, पाईपलाईन यासह इतर कृषीविषयक व्यवसाय बंद झाले होते. परंतु खरीप हंगामाची पेरणी जवळ असल्याने जिल्हा प्रशासनाने ता. २० एप्रिल पासून नांदेड शहरासह तालुका तसेच ग्रामीण भागातील कृषिविषयक आस्थापनांना सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू करण्याची परवानगी दिली.
हेही वाचा.....एप्रिलमध्ये २३ हजार ४५० टन धान्याचे वितरण
पाचशेच्यावर अर्ज दाखल
नांदेड शहरात कृषी व्यवसायिकांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत नांदेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून ओळखपत्र घेण्याचे आवाहन केले. तर तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार यांच्याकडून ओळखपत्र प्राप्त करून घेण्याचे निर्देश दिले. यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात नांदेड शहरातील कृषी व्यवसायिकांनी ओळखपत्रासाठी आजपर्यंत पाचशेच्यावर अर्ज केले. यात कृषी निविष्ठा मालकासह व्यवस्थापक, मदतनीस तसेच हमाल यांचा समावेश आहे. यासोबतच विद्युत मोटारी, ठिबक तुषार संच विक्रेते, कृषी संदर्भातील खते व बियाणे कंपनीचे प्रतिनिधी यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर केले.
हेही वाचलेच पाहिजे.....गटशेती योजनेंतर्गत ‘डीपीआर’ची मंजुरी रखडली
एवढे ओळखपत्र कशासाठी ?
या अर्जानुसार कृषी अधीक्षक कार्यालयाने नांदेड उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे अर्जासाठी पत्रव्यवहार केला. सुरुवातीला काही प्रमाणात ओखळपत्र दिले, परंतु यानंतर कृषी व्यवसायिकांना एवढे कशासाठी ओळखपत्र लागतात, या कारणावरून उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून ओळखपत्र देण्याचे काम थांबविल्याची माहिती मिळाली. यामुळे जिल्ह्यातील कृषी व्यवसायिकांसह शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
ओळखपत्रासाठी पाठपुरावा
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाचशेच्यावर ओळखपत्रासाठी अर्ज दाखल झाले आहेत. परंतु उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून ओळखपत्र देण्यात येत नाहीत. यामुळे अनेक व्यावसायिकांना पोलिसांच्या ससेमिराला सामोरे जावे लागत आहे. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु आहे. काही प्रमाणात ओळखपत्र दिल्यानंतर इतरांना ओळखपत्र देण्यासाठी मागणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याबाबत नांदेडचे उपविभागी अधिकारी लतिफ पठाण यांच्याशी संपर्क केला असता, त्यांचा संपर्क होवू शकला नाही.
वेळेवर ओळखपत्र मिळण्याची गरज
खरीप हंंगाम जवळ आल्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ओळखपत्राची आवश्यकता आहे. सध्या बियाणे, खते विक्रीचा महत्वाचा वेळ आहे. अशावेळी दुकाने सुरु राहिले नाही तर एकाच वेळी गर्दी होइल. यासाठी लगेच ओळखपत्र द्यावेत.
- मधूकर मामडे,
जिल्हाध्यक्ष, नांदेड जिल्हा सिड्स, फर्टीलायझरर्स ॲड पेस्टीसाइड असोशियशन.