नांदेड - सुरवातीला अतिवृष्टी आणि त्यानंतर संततधार पावसामुळे शेतात पाणी साचून पिकांची नासाडी झाली आहे. कापसाची झाडे लाल पडून पाने गळून पडत आहेत. परिणामी पहिल्या वेचणीतच कापसाच्या पऱ्हाट्या झाल्याने यंदाही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी भरपाईसाठी लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहे.
यंदाच्या वर्षी वेळेवर जून महिन्यात पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील वेळेवर खरिपाची पेरणी केली. सोयाबीन पेरणीच्या वेळी मात्र काही ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दरम्यान, पाऊस चांगला राहिल्याने पिके जोमात आली होती. त्यामुळे शेतकरी देखील भरघोस उत्पादन होईल म्हणून सुखावला होता. मात्र, पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले.
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान
जिल्ह्यात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या, ओढे, नाल्यांना पूर आला होता. यासोबतच अनेक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे शेतात पाणी साचून पिके आडवी पडली होती. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी राहिल्यामुळे खरिपातील कापूस, ज्वारी, सोयाबीन, तूर, उडीद, मुग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सततच्या पावसामुळे जमीनीत पाणी साचले आहे. त्यामुळे कपाशीची पाने लाल पडून ती गळून जात आहेत. परिणामी पहिल्या वेचणीतच कपाशीच्या पऱ्हाट्या होत आहेत. याबाबत कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
पाने गेली गळून
लोहा तालुक्यातील दगडगाव येथील गंगाधर विठ्ठलराव मोहिते यांच्या साडेतीन एकरमधील कपाशी पूर्णपणे लाल पडून पाने गळून गेली आहेत. कापसाची वेचणी झाल्यानंतर उवरित बोंड काळे पडल्याने शेतात केवळ पऱ्हाट्या शिल्लक राहिल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले. सततच्या पावसामुळे कपाशी लाल पडून पाने गळाली. यामुळे पहिल्या वेचणीनंतर मागे काही शिल्लक राहिले नाही. यंदा कापसाचे नुकसान जास्त झाले असल्याची माहिती शेतकरी गंगाधर मोहिते यांनी दिली.
हेही वाचलेच पाहिजे - हिंगोली : नवरात्रोत्सव जवळ आल्याने दूर्गा मुर्ती तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात
अशी करा फवारणी
शेतकऱ्यांनी कपाशीवर अॅझोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के अधिक डायफेनकोनॅझोल ११.४ टक्के एससी दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतात साचलेले पाणी त्वरित चर काढून बाहेर काढावे. मॅग्नेशिअम सल्फेट दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणात दोन ते तीन फवारण्या द्याव्यात.
- डॉ. खिजर बेग, कापूस विशेषज्ञ, कापूस संशोधन केंद्र, नांदेड.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.