सांगली : कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात ऑनलाईन शिक्षण पद्धती रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडे सहजासहजी स्मार्ट फोन उपलब्ध होणे, ही पहिली व महत्त्वाची गरज आहे. जिल्ह्यातील तब्बल 76 टक्के विद्यार्थी ही प्राथमिक गरज पूर्ण करू शकत नाहीत, त्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत, अशी माहिती शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे या गरीब विद्यार्थ्यांची एकप्रकारे चेष्टा होत असून ती थांबवता येईल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्रमुख शिक्षकांशी संवाद साधला. सोबतच ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन शिकवणाऱ्या याच्याशी किती विद्यार्थी कनेक्ट आहेत, किती जण नियमित जोडले जातात, याची माहिती घेतली. ती अतिशय धक्कादायक असल्याचा निष्कर्ष श्री. तेलंग यांनी काढला आहे.
जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिककडे सुमारे सव्वा दोन लाख विद्यार्थी आहेत. त्यातील 76 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाहीत. म्हणजेच सुमारे एक लाख साठ हजारावर विद्यार्थ्यांचा या पद्धतीत सहभागच नाही. त्यात वर्गवारी करणे शक्य आहे. काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडे असे फोनच नाहीत, काहींकडे आहेत मात्र ते कामावर असतात आणि मुलांना फोन उपलब्ध होत नाहीत, जे फोन वापरतात त्यांच्या आईकडे स्मार्ट फोन आहेत. अगदी हातावर मोजता येतील इतक्या पालकांनी खास विद्यार्थ्यांची निकड म्हणून त्यांना स्मार्ट फोन उपलब्ध करून दिले आहेत.
या स्थितीत जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, इंग्रजी माध्यम शाळांत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांची चेष्टा होत असल्याचे चित्र आहे. या सर्व विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत, हा त्यांचा दोष आहे का? तो नसल्याने फार बिघडणार नाही, मात्र त्यांची मानसिकता स्थिर राहत नसल्याचेही दिसत आहे. ही मुले अस्वस्थ आहेत. वर्गातील मित्र स्मार्ट फोनवर अभ्यास करत आहेत, पेपर सोडवत आहेत आणि आपण ते करू शकत नाही, याची त्यांना त्रास होतोय. ते पालकांकडे हट्ट करताहेत. भांडत आहेत. त्यातून घरात वाद होत आहेत.
या घडीला बहुतांश पालकांची आर्थिक स्थिती अडचणीची आहे. लॉकडाउन किती काळ वाढेल माहिती नाही. नोकरी, व्यवसायाचे काय होणार, कल्पना नाही. अशावेळी सर्व खर्च कमी करण्याकडे कल दिसतोय. अशावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नवा स्मार्ट फोन खरेदी करण्याची क्रयशक्ती असणारे किती आहेत? या स्थितीत अभ्यासाचे पर्याय बदलणे गरजेचे आहे.
रेडिओ नाही ओ !
जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक विभागाकडून रेडिओ अर्थात आकाशवाणीव्दारे मुलांना शिकवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी सर्व शिक्षकांनी पालकांशी संवाद साधला. त्यातूनही काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. बहुतांश पालकांनी आपल्या घरी रेडिओ नाही, असे सांगितले आहे. अर्थात, रेडिओची किंमत फार नसल्याने तो खरेदी करणे शक्य होणार आहे.
पर्यायी व्यवस्था करणे आमची जबाबदारी
स्मार्ट फोनव्दारे शिक्षण ही पद्धत आधुनिक काळात गरजेची आहे, मात्र आजघडीला 76 टक्के विद्यार्थ्यांकडे ती सोय नाही. अशावेळी पर्यायी व्यवस्था करणे आमची जबाबदारी आहे. त्यावर काम सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ.
- सुधाकर तेलंग, माध्यमिक शिक्षणाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.