vijay kulange
vijay kulange 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हाधिकारी कुलांगे यांचा "नगरी पॅटर्न' ओरिसात ठरतोय अव्वल! 

अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील

नगर - ओडिशामध्ये ऑक्‍टोबर 2018 मध्ये आलेले तितली वादळ अन्‌ त्यानंतर मे 2019 मध्ये दाखल झालेले फनी वादळ यांच्याशी गंजाम जिल्ह्याने निकराने सामना केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने या दोन्ही महाभयानक संकटांमध्ये "झीरो कॅज्युअल्टी' ही बिरुदावली या जिल्ह्याने मिळविली. जिल्हाधिकाऱ्यांनी राबविलेल्या विविध अभिनव प्रतिबंधात्मक योजनांचा पॅटर्न त्या वेळी केवळ ओडिशातच नव्हे, तर देशात गाजला. कोरोनाचे जागतिक संकट आले, त्यातही जिल्हाधिकारी सरसावले.

पहिली जमावबंदी, पहिली यात्रा-जत्रा व सार्वजनिक कार्यक्रम बंदी, पहिला लॉकडाउन, पहिल्यांदा मास्कची सक्ती, थुंकण्यावर बंदी, मोटरसायकलवर एकट्यानेच प्रवास, मास्क नसेल, तर शहरी भागात हजार रुपये व ग्रामीण भागात पाचशे रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पाचशे रुपये दंड, असे विविध आदेश भारतात सर्वांत आधी जारी करत नवीन मापदंड रचले. परिणामी चाळीस लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात आजपर्यंत एकही कोरोनाबाधित सापडला नाही. त्यामुळे हे जिल्हाधिकारी पुन्हा चर्चेत आले.

हे जिल्हाधिकारी दुसरे-तिसरे कोणी नसून, एक जिगरबाज नगरी तरुण आहेत. विजय अमृता कुलांगे. नगर तालुक्‍यातील राळेगण म्हसोबा हे त्यांचे गाव. कुलांगे यांचा "विजय' पॅटर्न ओडिशामध्येच नव्हे, जागतिक स्तरावर चर्चेचा ठरत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी कुलांगे यांचा खास गौरव करीत त्यांचे काम इतर अधिकाऱ्यांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले. नगरकरांसाठी आपल्या भूमिपुत्राच्या कौतुकाची ही "सक्‍सेस स्टोरी' अभिमानास्पद आहे. 

बंगालच्या उपसागराचा शंभर किलोमीटरचा किनारा लाभलेल्या गंजाम जिल्ह्यात तब्बल 22 तालुके. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा हा जिल्हा व नेहमीचा मतदारसंघही. त्यामुळे ओडिशाच्या राजकारणासह विविध बाबींसंदर्भात गंजाम जिल्हा कायम चर्चेत असतो. जागतिक पातळीवर कोरोनाचे थैमान सुरू झाले. त्या वेळी कुलांगे यांनी आपल्या जिल्ह्यात परदेशातून व इतर राज्यांतून येणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन 15 मार्च 2020 रोजीच गंजाम जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश जारी केला.

अशा प्रकारचा आदेश जारी होणारा गंजाम हा देशातील पहिला जिल्हा ठरला. जिल्ह्यातील पुरुषोत्तम तालुक्‍यातील तारातारिणी यात्रा प्रसिद्ध. यात्रेला दर वर्षी दीड-दोन लाख भाविक येतात. जमावबंदी आदेशामुळे ही यात्रा झाली नाही. त्यानंतर दंड हातात घेऊन नाचण्याचे फॅड असलेल्या "दंड नाचे' महोत्सवालाही बंदी घातली. परिणामी जिल्ह्यात कुठेही गर्दी झाली नाही आणि त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला चालना मिळू शकली नाही. 
दरम्यानच्या काळात ओडिशा राज्याने आपत्कालीन स्थिती घोषित केली. त्याच काळात तब्बल 730 भूमिपुत्र परदेशातून जिल्ह्यात आले. बाहेरच्या राज्यांतूनही कामानिमित्त गेलेले 30 हजार लोक परतले. त्यात मुंबई, चेन्नई, केरळ व तमिळनाडूत कामाला असलेल्यांचा भरणा जास्त होता. राज्य व देशाबाहेरून आलेल्या या मंडळींमुळे कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन कुलांगे यांनी देशातील पहिला लॉकडाउन गंजाममध्ये सुरू केला. तोही जनता कर्फ्यूच्या दिवशी म्हणजे 22 मार्चला. परराज्य व परदेशातून आलेल्या सर्वांना सक्तीने "होम क्वारंटाईन' केले. त्यांची दररोज अंगणवाडी सेविकांकडून हजेरी घ्यायची. सेल्फी काढून वरिष्ठांना पाठवायचे, असे "सिस्टेमॅटिक डेली रिपोर्टिंग' सुरू केले. दररोज तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याचा आढावा सुरू केला. त्यातूनच कोरोना तपासणीसाठी कोणत्या केस निवडायच्या याचा निर्णय झाला. सातशे जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. सर्व निगेटिव्ह निघाले. 

लॉकडाउनच्या काळात 1700 लोक विशाखापट्टणम येथून येऊन पुढच्या राज्यात चालले होते. त्यांना कॅम्पमध्ये थांबविले. जेवण, नाश्‍ता, टीव्ही सर्व सुविधा दिल्या. त्यांच्या देखरेखीला नोडल अधिकारी नेमले. विद्यार्थ्यांसाठी सरकारी पातळीवर विविध ऑनलाइन स्पर्धा घेत त्यांना व्यस्त ठेवले. जिल्ह्यातील सर्व म्हणजे 530 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी प्रत्येकी 20 बेडची अद्ययावत व्यवस्था तयार केली.

टाटा उद्योगसमूहाच्या साह्याने 200 बेडचे अद्ययावत कोविड हॉस्पिटल अल्पकाळात उभारले. जनतेला भाजी, धान्य, दूध व इतर अत्यावश्‍यक वस्तूंची "होम डिलिव्हरी' करण्यात यश मिळविले. कुलांगे स्वतः सायकलवर फिरून कोरोनाबाबत जनजागृती करीत असून, त्याचे गांभीर्य पटवून सांगत आहेत.

कलेक्‍टरच सायकलवर आल्याने लोकांना त्यांचे सांगणे भावते. परिणामी लोकसहभाग वाढण्यास मदत झाली. त्यामुळे लॉकडाउन, संचारबंदीची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होऊ लागली. अख्ख्या जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. येत्या 20 एप्रिलला जिल्ह्यातील विकासकामे, उद्योग व तत्सम बाबी कोरोनासंदर्भातील नियम पाळून सुरू करण्यात येणार असल्याचेही कुलांगे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

"सायकल'वाले कलेक्‍टर! 
विजय कुलांगे सन 2013च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. "आयएएस'ला सिलेक्‍शन होण्यापूर्वी कुलांगे यांनी नगर जिल्ह्यात जामखेड येथे तहसीलदार म्हणून बजावलेली कामगिरी आजही प्रशासन व जनतेच्या लक्षात आहे. तहसीलदार होण्यापूर्वी त्यांनी विक्रीकर निरीक्षक म्हणूनही उल्लेखनीय काम केले. त्याआधी राळेगण म्हसोबा येथे टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या वडिलांना हातभार लावत कुलांगे प्राथमिक शिक्षक झाले.

या नोकरीवर त्यांनी घराला "टेकू' देत बहिणींची लग्ने केली. तहसीलदार झाल्यानंतर दुष्काळी परिस्थितीशी प्रशासकीय सामना करीत कुलांगे यांनी मोठ्या जिद्दीने रात्रीचा दिवस करीत "यूपीएससी'चा अभ्यास केला. जिल्हाधिकारी झाले. सामान्य कुटुंबाची पार्श्‍वभूमी असल्याने कुलांगे जिल्हाधिकारीपदाचा डामडौल न करता अनेकदा सायकलवर सफर करून जनतेशी संवाद साधतात. त्यामुळे गंजाम जिल्ह्यातच नव्हे, तर अख्ख्या ओडिशामध्ये ते "सायकल'वाले कलेक्‍टर म्हणून प्रसिद्ध आहेत. माध्यमे, राजकारणी, प्रशासनाबरोबरच सामान्यांमध्येही कुलांगे साधेपणा व तत्परतेच्या शिस्तीमुळे प्रसिद्ध आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT