इचलकरंजी ( कोल्हापूर ) - ""संगणकीकरणाच्या युगात आज मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध होत आहे; मात्र या माहितीचे ज्ञानात रूपांतर होणे गरजेचे आहे,'' अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली.
शिरढोण (ता. शिरोळ) येथील साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था आणि रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रल यांच्यावतीने आयोजित सहाव्या संवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून "सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार उपस्थित होते.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीराम पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी रणरागिणी पुरस्कार ऍड. दिलशाद मुजावर, वैद्यकीय समाजसेवा पुरस्कार नंदिनी हिरेमठ यांना, तर साहित्य जीवनगौरव पुरस्कार बाळ बाबर तसेच जीवनरक्षक पुरस्कार दादासाहेब घोरपडे आणि कल्लाप्पा आंबी (खिद्रापूर) यांना प्रदान करण्यात आला.
श्रीमती भवाळकर म्हणाल्या, ""खरे साहित्य आपल्या विचारशक्तीतून आणि आपल्या अनुभवातून निर्माण होते. संत साहित्याच्या आधीही असे साहित्य निर्माण झाले. लोकांना जे वाटते ते संतांनी मांडले आहे. लोकांना शहाणे करण्यासाठी साहित्यातून त्यांनी मांडणी करताना ते लोकशैलीतून मांडले आहे. आज आपल्याला संगणकाच्या माध्यमातून माहिती मिळत आहे, या माहितीचे रूपांतर ज्ञानात होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ते आचरणात आणण्याचीही आवश्यकता आहे.''
श्री. पवार म्हणाले, ""विचार व्यक्त करणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे; मात्र माणसाच्या जीवनात वैचारिक प्रदूषण भयानक प्रमाणात आले आहे. अशा प्रदूषणाचे गांभीर्याने मंथन, चिंतन अशा व्यासपीठावरून होणे गरजेचे आहे. हे प्रदूषण स्क्रीन टाइममध्ये वाढले आहे. चार ते साडेचार तास कोणत्या ना कोणत्या स्क्रीनवर आज माणूस वेळ घालवत आहे. 1980 नंतरची स्क्रीन एजेस पिढी झाली आहे. संगणक, मोबाईल, टीव्ही अशा स्क्रीनवर त्यांचा वेळ जात आहे. अशा वातावरणाचा एक चांगला आणि एक वाईटही परिणाम होत आहे. एका अर्थाने यातून सहजपणे व्यक्त होण्याची संधी मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूला दबलेल्या आणि उत्क्रांतीच्या पातळीवर सोडून दिलेल्या विकृती मुक्तपणे बागडायला लागल्या आहेत. वैज्ञानिक प्रदूषण आणि सांस्कृतिक प्रदूषण अत्यंत घातक ठरत आहेत. या दोन्ही प्रदूषणाला आपण भिडणे गरजेचे आहे. उदारमतवादी, लोकशाहीवादी वैचारिक भूमिका न जुमानणाऱ्या अनेक गोष्टी होऊ लागल्या आहेत. अशातून वैचारिक अंधकार पसरू लागला आहे. त्यातून देशाचे भवितव्यही धोक्यात येऊ लागले आहे. बहुसंख्याकवाद आणि बहुमताने देश चालणे या दोन गोष्टी ज्यांना कळत नाहीत त्यांना लोकशाही शिकवण्याची गरज आहे आणि अशा संमेलनाच्या माध्यमातून हे काम निश्चितपणे होईल.''
संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास बालिघाटे यांनी स्वागत केले. अध्यक्ष दिलीप कोळी यांनी प्रास्ताविकात संस्थेतर्फे होत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या वेळी व्यासपीठावर संस्थेचे खजिनदार महावीर कांबळे, बाळासाहेब हेरवाडे, महादेव पाणदारे, धनपाल आडगाणे, सुनंदा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. डॉ. कुमार पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.