सलगरे : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची धनाची पेटी असणारी खिलार जनावरांची पैदास गेल्या काही वर्षांतील दुष्टचक्रामुळे आता भलतीच रोडावली आहे. बैलगाड्यांच्या शर्यंतीवर आलेल्या बंदीचे आता दुष्परिणाम दुष्काळी भागावर चांगलेच जाणवत आहेत. घराघरातील दावणी रिकाम्या दिसत असून हे चित्र असेल राहिल्यास येत्या काही वर्षांत खिलार जनावरे शोधावी लागतील अशी स्थिती आहे.
हे वाचा-कोरोनाचा संसर्ग झालेल्या 'त्या' लोकांबरोबर होते बेळगावचे तिघे पण...
सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी तालुके, सांगोला, माण, खटाव आणि आटपाडी या माणदेश परिसराचे पशुवैभव अशी खिलारची ओळख होती. जणू ती धनाची पेटीच होती. जनावरांच्या विविध हायब्रीड जाती आल्या तरी खिलारच्या पैदाशीला धक्का लागला नव्हता. तुलनेने खिलार गाई दूध कमी दिल्या तरी त्यांचे पालनपोषण शेतकऱ्यांला त्यांच्या खोंडांना मिळणाऱ्या किमतीमुळे परवडायचे. त्यांच्यामुळे घरोघरी मुबलक दूध-दुभते होते. त्यांच्यावर कुटुंबाचे अर्थकारण चालायचे.
हे वाचा-महिला नगराध्यक्षा धावून आल्या त्यांच्या मदतीला
कारण खिलारच्या खोंडांना पश्चिम महाराष्ट्रातील जनावरांच्या बाजारांमधून मागणी असायची. ती पळाऊ जात म्हणून ओळख असल्याने लहाणपणापासून त्यांचे संगोपन व्हायचे. चांगल्या खोंडासाठी गाईचे दूध तसेच अंडी घालून पोषण केले जायचे. लहाणपणापासूनच शर्यंतीची तालीम दिली जायची. हीच खोंडे बैलगाड्यांच्या शर्यंतीमधील अजिंक्यवीर असायची. महाराष्ट्र- कर्नाटकातील सर्वच मोठ-मोठ्या यात्रांमधील शर्यंतीत खिलारचाच बोलबाला असे. खिलारच्या एक दाती खोंडांना काही बडे हौशी शेतकरी दहा लाखांपर्यंत दर मिळायचा. त्यातून दुष्काळी भागातील कुटुंबाचे अर्थकारण हलत होते. ते आता ठप्प होताना दिसत आहे..
जातीवंत खिलार खोंड जतन करून त्यातून मिळालेल्या पैशातून गरिबाच्या कुटुंबातले एखादे लग्नकार्य सहज पार पडायचे. मात्र बैलगाडी शर्यती बंदीचा धक्का बसल्याने शेकडो कुटुंबाचा आर्थिक आधारच संपला आहे.''
..........
""शासनाने बैलगाडी शर्यतीसाठी सुधारित नियमावली केली होती. मात्र त्यालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान मिळाल्याने बैलगाड्यांच्या शर्यंतीवर टांगती तलवार आहे. मिरज पूर्व भागातील सलगरे, बेळंकीसह अनेक गावांनी ग्रामसभेत शर्यंतीच्या बाजूने ठराव केले होते. लोकभावना समजून निर्णय व्हायला हवा.''
नेताजी गडदरे, बेळंकी ग्रामपंचायत
............
""ओला चाऱ्याचे आणि भरड्याचे दर गगनाला भिडले आहेत अशा स्थितीत हौस म्हणून खिलार पाळणे मुश्कील झाले आहे. जनावरांनी फुललेली गोठे कोमेजून जात आहेत. दहा-पंधरा जनावरांचा गोठा चार-पाच जनावरांवर आला आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास दुष्काळी भाग खिलारमुक्त होण्याची भीती आहे.''
नागेश गावडे, एरंडोली
...........
कुस्ती आणि बैलगाडी शर्यंत महाराष्ट्राची ओळख आहे. योग्य नियम करून नव्याने शर्यंती सुरू होऊ शकतात. दक्षिणेतील राज्यांनी जलीकट्टु शर्यंतीसाठी आग्रह धरला होता. तीच भूमिका शासनाने न्यायालयात घेतली पाहिजे. शेजारच्या कर्नाटक राज्यात विजापूर, ऐनापूर, तिकोटा येथे पोलिस बंदोबस्तात बैलगाडी शर्यती सुरू आहेत.''
दिलीप बुरसे,
माजी सभापती, मिरज पंचायत समिती
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.