श्रीरामपूर - 'जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांत भारतीय जनता पक्ष - शिवसेना युती झाल्यास रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत असेल; अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे लढू. वाद मिटवून त्यांनी एकत्र लढावे अशी आपली इच्छा आहे,'' असे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकारांना सांगितले. आठवले यांनी आज सकाळी लोणी येथे जाऊन माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे त्यांनी सांत्वन केले. तेथून औरंगाबादला जाताना त्यांनी काही काळ येथे थांबून पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, 'युती झाल्यास नगर जिल्हा परिषदेच्या किमान 17 आणि पंचायत समित्यांच्या 30 जागा आम्हाला मिळाव्यात. राज्यातील काही पंचायत समित्यांचे सभापतिपद, जिल्हा परिषद अध्यक्षपदही पक्षाला मिळाले पाहिजे.'' मराठा आरक्षणाला विरोध नसल्याचे स्पष्ट करून आठवले म्हणाले, ""हा समाज आरक्षणाला तयार नव्हता, तेव्हापासून मी आरक्षणासाठी आग्रह धरला होता. राज्याने घेतलेला निर्णय न्यायालयात टिकत नसल्यामुळे घटनेत तरतूद केली पाहिजे. पंचाहत्तर टक्के आरक्षण केल्यास हा प्रश्न निकाली निघेल.'' उत्तर प्रदेशातील 250 जागा रिपब्लिकन पक्ष लढविणार आहे. भाजपला जातीयवादी म्हणणाऱ्या मायावतींनी मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचा पाठिंबा घेतला होता हे विसरू नये, असेही आठवले म्हणाले. नोटाबंदीचे समर्थन आठवले म्हणाले, 'काळा पैसा उघडा करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यासाठी नोटा उपलब्ध करणे आणि इतर पूर्वतयारीची गरज होती. परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. "भीम ऍप' सुरू करून पंतप्रधानांनी बाबासाहेबांबद्दल आदर व्यक्त केला आहे. फडणवीस सरकारचे कामही चांगले असल्याने भाजप पहिल्या क्रमांकावर असल्याचे नगरपालिका निवडणुकीतून दिसले.'' |