बंगळूर - मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा व पक्षश्रेष्ठींनी बेळगाव व बंगळूर जिल्ह्यातील पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काही आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपमधील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. काही विद्यमान मंत्र्यांना कमी करून भाजपच्या निष्ठावंत आमदारांना सामावून घेण्यात येणार आहे. त्यामुळे, भाजप सरकार सत्तेवर येण्यास कारणीभूत ठरलेल्या नूतन आमदारांची तगमग वाढली आहे.
निष्ठावंतांसाठी काही विद्यमानांना नारळ
मंत्रिमंडळ विस्तार महिनाअखेरीस होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यायचे याबाबत निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळात समतोल राखला जावा व नूतन आमदारांच्या अपेक्षाही पूर्ण व्हाव्यात असा सल्ला त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे. निष्ठावंतांच्या अपेक्षा विचारात घेऊन दोन्ही गटातील काही सदस्यांना सामावून घेण्यात येणार असून प्रादेशिक समतोलही राखण्यात येणार आहे.
येडियुराप्पा व भाजप पक्षश्रेष्ठी बेळगाव आणि बंगळूर जिल्ह्यातून विजयी झालेल्या काही बंडखोरांना वगळण्याबाबत साशंक आहेत. बेळगाव जिल्ह्यातील आमदारांत रमेश जारकिहोळी (गोकाक), महेश कुमठळ्ळी (अथणी) आणि श्रीमंत पाटील (कागवाड) यांचा समावेश आहे. त्यामधील जारकीहोळींचे मंत्रीपद निश्चित आहे. परंतु, कुमठळ्ळी व पाटील यांना स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी जारकीहोळींवरच सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बंगळुरातील तीनपैकी एक किंवा दोघांना मंत्रीपद मिळणार आहे. एस. टी. सोमशेखर (यशवंतपूर) आणि भैरती बसवराज (केआरपुरम) यांना मंत्री केले जाऊ शकते. तर महालक्ष्मी लेआउटचे आमदार गोपालय्या यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता धूसर आहे.
निष्ठावंतांना संधी
बंडखोरांना संधी देण्यासाठी पक्षातील निष्ठावंत व ज्येष्ठांना बाजूला ठेवण्यात आले होते. मात्र, याविरोधात उमेश कत्ती आणि मुरुगेश निराणी या ज्येष्ठ नेत्यांनी आवाज उठवून मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरु केल्याने पक्षाला निष्ठावंतांचाही विचार करणे भाग पडले. निराणी यांना मंत्रीपदाची शक्यता कमी असली तरी उमेश कत्ती, अरविंद लिंबावळी आणि मंगळूरचे अंगार यांना मंत्रीपद मिळू शकते. बंडखोर आणि निष्ठावंतांमधील कलह हाताळण्यासाठी पक्षाच्या काही वरिष्ठ मंत्र्यांनी स्वत:हून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी पक्षश्रेष्ठींची अपेक्षा आहे. स्वेच्छेने माघार घेऊन राजीनामा द्यावा, असे त्यांना सुचविण्यात आले आहे. त्यानुसार सी. सी. पाटील, बसवराज बोम्माई किंवा जगदीश शेट्टर यांची गच्छंती होऊ शकते.
काही जागा रिक्त ठेवणार
इच्छुकांनी उघडपणे बंडखोरी करु नये यासाठी मंत्रिमंडळातील काही जागा रिक्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व ११ बंडखोरांना मंत्री करता येणार नाही. तसे झाल्यास बेळगाव व बंगळूरमधील मंत्र्यांची संख्या अधिक होऊन तक्रारी वाढतील. प्रत्येक जिल्ह्याला समान प्रतिनिधीत्व देण्यासाठी काही जणांना त्याग करावा लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.