सांगली : खानापूरला जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आणि पुढे पवई आयआयटीमधून सौर ऊर्जा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रसाद कुलकर्णी यांनी बायोगॅस, सौर ऊर्जेची कल्पक साधने बनवणे, मध उत्पादन आणि विक्री, अन्नपदार्थ वाळवून विक्री असे अनेक उद्योग करीत आपली धडपड सुरू ठेवली आहे. त्यांचे हे प्रेरणादायी प्रयोग त्यांच्याच शब्दात.
पदवी शिक्षणानंतर मी काही काळ खासगी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकी केली मात्र त्यात मन रमलं नाही. सुरवातीला मी ऊर्जाविषयक प्रकल्पात डोकं घातलं. बायोगॅस बनवून द्यायचा माझा पहिला उद्योग फेल गेला. कारण त्यामागे व्यावसायिकता त्यात नव्हती. तसंच आपल्याकडे अजून बायोगॅस बाबत गैरसमजच अधिक आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या कुडाळच्या भगीरथ या स्वयंसेवी संस्थेचे प्रसाद देवधर यांनी ही बाब माझ्या लक्षात आणून दिली आणि त्यांनी मला त्यातलं अर्थकारणही समजून सांगितलं. त्यामुळे मी त्यातून बाहेर पडल्यानंतर 2017 मध्ये शेतीमाल अन्न प्रक्रियेच्या क्षेत्रात यायचं ठरवलं. याची आवड मला "आयआयटी'मध्ये एका अभ्यासविषयाच्या निमित्ताने लागली होती.
अन्नपदार्थ टिकवणे, त्यातील पौष्टिकता वाढवणे, चव वाढवणे यात मोठी बाजारपेठ आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा शुद्ध मध निर्मितीत लक्ष घातले. त्यासाठी मधामाशा पालनासाठी पेट्या तयार करणे, त्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. आता मी शुद्ध मध देणाऱ्या उत्पादकांचा गट बांधून त्याचे पॅकिंग आणि विक्रीचं काम करतोय. वर्षाकाठी दोन अडीचशे किलो मधाची मी विक्री करतो. मधाला खूप मागणी आहे मात्र शुद्ध मध मिळणे ही मोठी अडचण आहे.
मध निर्मिती आणि विक्री करतानाच मला माणसांच्या गरजा आणि आवड या दोन्ही गोष्टी आपण दिल्या पाहिजेत असं लक्षात आलं. आपल्याकडं न्युडल्स खाणं इन्स्टंट फुड म्हणून चांगले रुजलेय. मग त्याला पर्याय आपण आपले देशी पदार्थ का देऊ नयेत म्हणून मी परंपरागत "माडगं' तयार केलं. अवघ्या पंधरा मिनिटांत पौष्टिक माडगं तयार करता येईल. ओघानेच आवळा कॅन्डी, मोर आवळा, पापड, सांडगे अशा अनेक खाद्यान्नाचं मार्केट आपण पकडलं पाहिजे हे लक्षात आलं. आता दोन-तीन महिलांना पगारी नेमून मी हे काम वाढवलं आहे.
दोन वर्षांत चांगलीच उलाढाल वाढली आहे. हे अन्नपदार्थ स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळवण्यासाठी ड्रायर हवेत. तसे ड्रायर मी बनवून विक्री करतो. या पदार्थाचं बी इलाईट फुड प्रॉडक्टस् नावाने ब्रॅन्डिंग केलं आहे. ऑनलाईन मार्केटिंगही सुरू आहे. अन्नप्रक्रिया उद्योगात खूप संधी आहेत. त्यात ऍटोमायझेशनही येतेय. मात्र भारतातील कुशल मनुष्यबळाला यात मोठा वाव आहे. तरुणांनी यातल्या संधी शोधून पुढे यायला हवे.
संपादन- अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.