कोल्हापूर : लसीकरणानंतर कोरोना होऊ शकतो; पण लसीकरणानंतर झालेल्या कोरोनाची तीव्रता कमी होते. ताप, खोकला किंवा कोरोनामुळे शरीराच्या इतर अवयवांवर होणारा परिणाम ८० टक्के कमी होतो. त्यामुळे लसीकरण महत्त्वाचे आहे.
देशभर लसीकरणाची मोहीम सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही ६० वर्षांवरील आणि ४५ वर्षांवरील इतर आजार असणाऱ्या लोकांना लसीकरण केले जात आहे.
दरम्यान, लसीकरणामुळे कोरोना होणार नाही, अशी अनेकांची समजूत आहे. वास्तविक लसीकरणानंतरही कोरोना होण्याचा धोका आहे. मात्र, कोरोना संसर्ग झाल्यानंतर एखाद्याच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामाला निश्चितपणे लगाम बसणार आहे. लस घेतल्यानंतरही सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. कोरोनाच्या आधी लस घेणे गरजेचे आहे. मास्क वापरणे बंधनकारक आहे.
सध्या कोरोनामुळे १०० पैकी २ ते ४ लोकांचा मृत्यू होत आहे. हे मृत्यूचे प्रमाण रोखण्यात शासनाकडून दिली जाणारी लस प्रभावीपणे काम करते. मृत्युदर कमी करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. सध्या कोविशिल्ड लस दिली जात आहे. या लशीला पर्याय म्हणून कोवॅक्सिन लसही प्रभावी आणि सुरक्षित आहे. ६० वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर, किडनीचे आजार असणाऱ्यांनाही ही लस घेता येते.
लस घेतल्यानंतर काय जाणवते?
ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे सामान्य परिणाम दिसतात. ते १ ते २ दिवस राहतात. सध्या पॅरासिटमॉल व क्रोसिन या औषधाने बरे वाटते. काहींना ते जाणवत नाहीत. इतर त्रास झाला तर घाबरण्याचे कारण नाही. लशीमुळे प्रतिकारशक्ती वाढते.
लस घेण्यासाठी जाताना :
लस घेण्याआधी जेवण करून जावे. तसेच, आधारकार्ड व पॅनकार्ड घेऊन जावे. दोन वेळा लस घ्यावी लागते. पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेतला पाहिजे.
हृदयरोग, किडनी विकार, प्रत्यारोपण, संधिवात, स्टिरॉईड घेणाऱ्यांनी लस घ्यावीच. धोका नसला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास उपयुक्त ठरते.
कोणी लस घेऊ नये :
गर्भवती महिला आणि १६ वर्षांखालील मुलांनी लस घेऊ नये.
लसीकरणानंतर काय खबरदारी घ्यावी ः
लसीकरणानंतरही मास्क, सॅनिटायझरचा वापर, तसेच सुरक्षित अंतर ठेवलेच पाहिजे.
लसीकरणामुळे... दुसरी लाट टाळली जाऊन मृत्युदर कमी करण्यास मदत होणार आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी होण्यास मदत.
पहिला डोस घेतल्यानंतर
४५ दिवसांत शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते.
"कोरोना लस घेतल्यानंतरही कोरोना होण्याचा धोका संभवतो; पण लसीकरणानंतर लोकांची ८० टक्के प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे लोकांनी लस घेणे आवश्यक आहे."
- डॉ. योगेश साळे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.