सांगली- महापूराच्या काळात राज्य सरकारने जाहिर केलेल्या बांधित कुटुंबाना मोफत धान्य, रॉकेल वाटपाचा मोबदला रेशन दुकानदारांना मिळालेली नाही. राज्य सरकारने पूरबाधितांना दिलेल्या धान्याच्या प्रमाणात ही रक्कम किमान दहा कोटीच्या घरात आहे. सांगली जिल्ह्यातील पुरबाधित 67 हजार कुटुंबाना प्रत्येकी 6715 टन गहू व तांदळाचे वाटप केले. गेली आठ महिने रेशन दुकानदार 2.02 कोटी रक्कमेच्या प्रतिक्षेत आहेत. फुकटचे धान्य वाटपाचे काही खरे नाही, अशी आता चर्चा सुरु झालेली आहे. रिबेट की मानधन यापेक्षा तातडीने मोबदला मिळावा, अशी मागणी आहे.
राज्यभरात ऑगस्ट 2019 मधील पहिल्या आठवड्यात महापूराने दणका दिला. राज्य सरकारने त्यावेळी पुरग्रस्तांना मोफत धान्य अन् रॉकेल, सानुग्रह अनुुदान, घरे पडलेल्यांसाठी अनुदान, पशुपक्षी नुसकान, शेती आणि अन्य अनेक नुकसान भरपाई दिलेल्या बाबींचा समावेश होता. त्यात रेशन दुकानदारांकडून मोफत धान्याचे वाटप झाले. काही गावात त्यांच्याकडून रॉकेलही वाटले. तर काही गावात स्वतंत्र यंत्रणाकडून रॉकेलचे वाटप झाले.
सांगली जिल्ह्यात 12 ऑगस्टपासून प्रत्यक्षात धान्याचा वाटप सुरु झाले होते. राज्य सरकारने पुरग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ देण्याची घोषणा केली. त्यावेळी राज्यभरात सुमारे चाळीस हजार टन धान्याचे वितरण करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील 67 हजार कुटुंबांना एकूण 6 हजार 715 क्विंटल गहू व 6 हजार 715 क्विंटल तांदूळ मोफत वाटले. तसेच 47 हजार 852 इतक्या बाधित कुटुंबांना 5 लिटरप्रमाणे 2 लाख 39 हजार 260 लिटर केरोसीन वाटले होते.
जिल्ह्यातील नदीकाठावरील 104 गावाना महापुराचा फटका बसला होता. त्यातील बहुतांश नुकसान भरपाई, सानुग्रह अनुदान, मदतीचे वाटप पूर्ण झालेले आहे. मात्र रेशन दुकानदारांना त्यांच्या भाषेत रिबेट किंवा मानधन आजपावेतो मिळालेले नाही. ते आजही प्रतिक्षेत आहेत. प्रति क्विटल 150 रुपये दुकानदारांना मिळतात. गहू, तांदूळ असे 13 हजार 430 टन धान्य वाटपाचे मोबदला दोन कोटी दोन लाखावर होते. तो अद्यापही मिळालेला नाही.
रिबेट की मानधन...
धान्य वाटलेल्यांचा मोबदला रेशन दुकानदारांना मिळालेला नाही. सरकारी भाषेत त्याला "मानधन' म्हणतात आणि किंमत घेवून विकलेल्या धान्यांसाठी "रिबेट' असे म्हटले जाते. गेली आठ महिने दुकानदार म्हणतात की, आमचे रिबेट अद्याप सरकारकडून येणेच आहे. सांगली जिल्ह्यात मोफत वाटलेल्या धान्याचे रिबेट दोन कोटी 2 लाख रुपये येणे बाकी आहे.
" राज्य सरकारने महापूरकाळात दिलेल्या मोफत धान्याचे मानधनबाबत अद्याप काहीच कळवलेले नाही. हा निर्णय राज्यस्तरावरील आहे. आलेल्या आदेशाची पुरवठा विभाग तंतोतंत अंमलबजावणी करते.'
वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.