सातारा : लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करून काही उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सात औद्योगिक वसाहत व एक विशेष आर्थिक क्षेत्रातील सुमारे पाचशे उद्योगांची चाके पुन्हा गतिमान होण्याची शक्यता आहे.
सध्या सॅनिटायझर, मास्क, व्हेंटिलेटर, औषधे, खाद्यपदार्थ, बेकरी उत्पादने, मसाले उत्पादनासह लष्कराला साहित्य पुरविणारे असे एकूण 150 उद्योग सुरू आहेत. येत्या चार- पाच दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक होऊन यामध्ये काही उद्योग सुरू करण्याबाबत निर्णय होणार आहे. त्यानुसार आणखी सुमारे 500 उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, अशी अपेक्षा आहे.
सातारा जिल्ह्यातील सात औद्योगिक वसाहतींसह खंडाळा, शिरवळ येथील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात सुमारे अडीच हजार उद्योग आहेत. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनची मुदत तीन मेपर्यंत वाढविली; पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 20 तारखेपासून निर्बंध शिथिल करून कृषीपूरक उद्योग, निवडक औद्योगिक क्षेत्रे, सर्व प्रकारची मालवाहतूक, ग्रामीण अन्न प्रक्रिया उद्योग, अत्यावश्यक हार्डवेअर पॅकेजिंग, ग्रामीण भागातील बांधकाम व औद्योगिक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील कमी कामगार संख्या व ऍटोमेशन असलेले उद्योग सुरू होणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तिच्या माध्यमातून निर्बंध शिथिल करून काही उद्योग, व्यवसाय व मालवाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जिल्ह्यात सात औद्योगिक वसाहती असून, यातील बहुतांशी उद्योग हे फौंड्री स्वरूपाचे आहेत, तर काही ठिकाणी सॅनिटायझर निर्मिती, फार्मा कंपन्यांचा समावेश आहे. काही उद्योगांनी ऍटोमेशन केले आहे. त्यासाठी रोबोटिक टेक्नॉलॅजीचा वापर केला आहे. अशा उद्योगांमध्ये कामगार कमी असतात, तसेच कामगारांना सोशल डिस्टन्सिंग पाळून काम करता येऊ शकते, तसेच ग्रामीण भागातील औद्योगिक प्रकल्पही सुरू करता येणार आहेत. त्यासाठी जिल्हास्तरीय समितीची परवानगी घ्यावी लागणार आहे, तर कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी परवाना घ्यावा लागेल.
येत्या 20 तारखेपासून आणखी काही उद्योग सुरू करण्यासाठी दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक होऊन निर्णय होणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री व उद्योगमंत्रीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करणार आहेत. त्यामुळे कोणत्या कंपन्या सुरू करायच्या आणि कोणत्या कंपन्यांना सूट द्यायची हे जिल्हाधिकारी ठरविणार आहेत. सध्या तीस टक्के कामगार असलेल्या कंपन्याच सुरू आहेत. पुढच्या टप्प्यात 40 ते 50 टक्केपर्यंत कामगार असणाऱ्या कंपन्या सुरू करण्याची परवानगी मिळू शकेल.
उद्योग सुरू कराच : फराेख कूपर
""उद्योगधंदे लवकरात लवकर सुरू करावेत, अशी आमची आग्रही भूमिका आहे, असे मत ज्येष्ठ उद्योगपती आणि कूपर उद्योगसमूहाचे अध्यक्ष फरोख कूपर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, ""चीन मोठ्या प्रमाणात जागतिक बाजारपेठेत कब्जा करण्याचा घाट घालेल. युरोपीय देशांनीही इंडस्ट्री सुरू केली आहे. तेथून आमच्याकडे मालाची मागणीही येऊ लागली आहे. सामाजिक अंतर राखून अनेक उद्योग सुरू होऊ शकतात. बहुतांश कामगार स्थानिक असल्यामुळे उद्योग सुरू करण्यात कोणतीही अडचण नाही. उत्पन्न सुरू झाले पाहिजे. अखेर हा कामगारांच्याही रोजीरोटीचा प्रश्न आहे. जिल्हा प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.''
""पंतप्रधानांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करून काही उद्योग सुरू करण्याचे धोरण घेतले आहे. याबाबत जिल्हाधिकारी व त्यांची समिती जिल्ह्यातील कोणते उद्योग सुरू करायचे याबाबत निर्णय घेतील. निर्बंध व सोशल डिस्टन्सिंग पाळून उद्योग सुरू करण्याबाबत आम्हीही तयार आहोत.''
- भरत शेठ, मासचे पदाधिकारी, सातारा.
""जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अत्यावश्यक वस्तू निर्मिती करणारे 150 उद्योग सुरू आहेत. लॉकडाउनचे निर्णय शिथिल करण्याबाबत केंद्राच्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. त्यानुसार आगामी काही दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीनंतर नवीन काही उद्योग सुरू करण्याचा निर्णय होईल.''
- संदीप रोकडे, जिल्हा उद्योग अधिकारी, सातारा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.