Sangli School
Sangli School esakal
पश्चिम महाराष्ट्र

शाळेतच विकृती; जबाबदारी कोणाची? नामांकित संस्‍थेतील शिक्षकानेच केले विद्यार्थिनीशी गैरवर्तन!

​शेखर जोशी

अनेक दुष्कृत्यांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी नव्हे, तर शिक्षकांवर संशय व्यक्त झाला आहे हे अधिक गंभीर आहे.

काही महिन्यांपूर्वी एका नामांकित संस्‍थेतील एका निवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षकाने माध्यमिक विभागातील मुलीशी गैरवर्तन केले. त्याविरोधात राजकीय पक्षांनी शाळेत जाऊन जाब विचारला. प्रेमप्रकरणातून (Love Affair) एका मुलीने पालकांसमोरच कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या प्रियकरानेही आत्महत्या केली. या धक्क्यांतून सावरत असताना दोन दिवसांपूर्वी एका नामांकित शाळेतील पहिलीतील मुलींसोबत शिक्षकाकडून विकृत चाळे केल्याचे प्रकरण उघडकीस आले.

गेल्या चार-सहा महिन्यांतील या घटना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. यातून शाळांच्या अब्रूची लक्तरे टांगली जातात. इथे शाळांची, व्यवस्थापनांची शंभर टक्के जबाबदारी आहेच. मात्र, केवळ शाळेला (School) किंवा पालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून जबाबदारी संपत नाही. याकडे समाज म्हणून आपली इयत्ता वाढवणे गरजेचे आहे.

गेले दोन दिवस सांगलीतील (Sangli) एका संस्थेतील विकृत शिक्षकाच्या कृत्याने शिक्षण क्षेत्राला काळिमा फासला गेला आहे. या नराधमाने निष्पाप मुलींशी दुष्कृत्य केल्याचे कळते. भीतीपोटी त्या मुलींनी पालकांनाही सांगितले नाही. एकूणच शिक्षकी पेशाला बदनाम करणाराच हा प्रकार आहे. चांगले शिक्षण मिळावे, यासाठी पोटाला चिमटा काढून मध्यमवर्गीय पालक महागड्या शाळांकडे जातात. शिक्षणाबरोबरच (Education) निकोप आरोग्यदायी सामाजिक वातावरण मिळावे, ही देखील त्यांची अपेक्षा असते. ती पूर्ण करणे शिक्षण संस्थाचालकांची जबाबदारी आहे.

अनेक दुष्कृत्यांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी नव्हे, तर शिक्षकांवर संशय व्यक्त झाला आहे हे अधिक गंभीर आहे. उच्चभ्रूंच्या शाळांची ही स्थिती असेल, तर जिथे कोणालाही फिकीर नसलेल्या सरकारी शाळांच्या स्थितीबद्दलही शंकेची पाल चुकचुकते. इथे सरसकट व्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा हेतू नाही, तर हा संवेदनशील मनाचा आक्रोश आहे. ‘अशा’ प्रकारांबद्दल सतत दबक्या आवाजात कानावर येत असते. आणि बऱ्याचदा त्यावर पांघरूण घालण्याकडे समाजाचा कल असतो. हे केवळ शैक्षणिक संस्थेचे अपयश नसून, समाजातील एकूण विकृतीचाही तो आरसा आहे.

अशा घटना उघडकीस आल्या की चिंता व्यक्त होते. दोन-चार दिवस चीड, संताप व्यक्त करून सारे विसरून जातात. लोकलज्जेस्तव, भीतीपोटी लैंगिक अत्याचाराबद्दल बोलणे टाळले जाते. विकृतांच्या कृत्यावर पांघरूण घातले जाते. याचा फायदा असे विकृत घेतात. बालकांवर झालेला शारीरिक अत्याचार योग्य प्रकारे हाताळण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ अथवा विशेष सोयी अजूनही फारशा उपलब्ध नाहीत. पुढच्यास ठेच मागचा शहाणा, असे इथे दिसत नाही हे अधिक दुःखद.

शाळांमधून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले म्हणून संस्थाचालकांनी जबाबदारी संपत नाही. कारण आपल्या स्टाफच्या मनातील हिंसा त्यातून दिसत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. हा उपाय गुन्हा घडल्यानंतर शोधण्याचे साधन आहे. पालक बैठका केवळ शैक्षणिक चर्चेसाठी नाहीत. त्यात खुलेपणा हवा. त्यातून काय सहन केले जाणार नाही, याबाबत स्पष्ट संदेश दिला गेला पाहिजे. मूल शाळेच्या बाहेरच, कुटुंबात अधिक असते. ते ज्या रिक्षा, बसने येते तिथे तरी सुरक्षित आहे का? तसा मनाचा थांगपत्ता अवघडच. एरवी नॉर्मल वाटणाऱ्या व्यक्तीही टोकाच्या गुन्हेगारी वर्तनाच्या असतात. अशा वर्तनाची शाळेच्या आवारात किंवा बाहेर अशी विभागणी करून शिक्षक - पालक एकमेकांवर जबाबदारी टाकू शकत नाहीत. या सीमारेषा खूप पुसट आहेत.

मुले सुरक्षित ठेवणे ही दुतर्फा जबाबदारी आहे. ती निरंतर निगराणी आणि संवादातून पार पाडली जाऊ शकते. त्यात सरकारी अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत. कायद्याच्या पातळीवर शाळांमध्ये विशाखा, लैंगिक छळ प्रतिबंध, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो), पालक-शिक्षक समन्वय, परिवहन अशा एक ना अनेक समित्यांची व्यवस्था आहे. या व्यवस्था कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षात आहेत का हे पाहण्याची जबाबदारी कोणाची? शिक्षण संस्थाचालकांच्या संघटनांनी सर्व शाळांसाठी एक समान कार्यप्रणाली विकसित करून त्‍याचा अंमल करावा. केवळ सरकार दरबारी कामांसाठी, मंजुरीपुरते संघटन उपयोगाचे नाही. एकूण शाळा पोलिसांच्या कक्षेत आणण्यापेक्षा शाळांवर स्वनियंत्रण...स्वपोलिसिंग कार्यक्षमपणे केले पाहिजे. भयमुक्त शालेय वातावरण निर्मितीची जबाबदारी सर्वांनी घ्यावी.

बोध काय?

अलीकडच्या काळात निरीक्षणगृहे, आश्रमशाळांमधील घृणास्पद प्रकार चव्हाट्यावर आले आहेत. काही संस्थाचालकांना जन्मठेपही झाली आहे. थोडे मागे वळून बघितले, तर भारतात दर पाच तासाला एक बालक लैंगिक अन्यायाचा बळी ठरते, अशी आकडेवारी सांगते. आजूबाजूचे शैक्षणिक वातावरण मोकाट संस्कृतीला बळ देणारे आहे. ‘कॅफे’ नावाचे ठिकाण अशा कृत्यांना बळ देते. तेथील विकृत प्रकार पोलिसांच्या आश्रयाने घडतात, अशी उघड चर्चा आहे. महाविद्यालयांमधील ॲन्टी रॅगिंग समित्या खरेच कृतिशील आहेत का? यानिमित्ताने एकदा सर्व संबंधितांनी उजळणी केली, तरी काही तरी बोध घेतला असे होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT