अक्कलकोट (सोलापूर) : कोरोना महामारीच्या संकटाला चार महिने झाले तरी शहर व तालुक्यात कोरोनाच्या संसर्गबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात अफवांमुळे गैरसमज पसरत आहेत. एकीकडे कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन दिवसरात्र झटत असताना जनतेत मात्र वेगवेगळ्या अफवा पसरत असल्यामुळे प्रशासनात नाराजी दिसून येत आहे. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसीलदार अंजली मरोड यांनी केले आहे.
हेही वाचा : मोठी ब्रेकिंग ! कडक संचारबंदी उठल्यानंतर शेतमालासह अन्य मालाची खरेदी शहराबाहेरच; "या' ठिकाणी केली सोय
जनतेत कोरोनाबाबत अफवा पसरून सामान्य माणसांच्या जिवाशी सध्या तालुक्यात खेळ सुरू आहे. या महामारीच्या संकटाने संपूर्ण विश्व हादरून गेले असताना आपल्या तालुक्यातील जनतेत मात्र कोरोना या विषाणूबाबत अजूनही गांभीर्य नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जनतेत संभ्रम निर्माण करणारे, गैरसमज निर्माण करणारे मेसेज व्हायरल होत असल्यामुळे तालुक्यात प्रशासनाला काम करण्यात अडचण येत असल्याचे तहसीलदार अंजली मरोड यांनी सांगितले. कोण म्हणतोय कोरोना टेस्ट पूर्णपणे बोगस आहे, क्वारंटाइनमधील लोकांना सोयीसुविधाच नाहीत, टेस्टिंगला गेल्यावर निगेटिव्ह पेशंटला पॉझिटिव्ह ठरवतात, पैशासाठी हा सर्व खेळ चालू आहे, तर कोण म्हणतोय प्रत्येक पेशंटच्या पाठीमागे केंद्राकडून पैसा मिळतो... सध्या अशा अनेक अफवा पसरत आहेत. यामुळेच प्रशासनाला कोरोनाची साखळी तोडण्यात अडचण येत आहे. सध्या अशा चुकीच्या अफवांमुळे रॅपिड अँटिजेन टेस्टला अल्प प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा : सोलापूर शहरात कोरोनाचा हल्ला कर्त्या व्यक्तींवरच
महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन व नगर प्रशासनाने कोरोना महामारीत उत्तम प्रकारे काम केले आहे आणि ते आजही करत आहेत. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील स्थिती पाहता आज तालुक्यातील कोव्हिड सेंटरमधील सोयीसुविधा म्हणा, क्वारंटाइनमधील नागरिकांना मिळणाऱ्या सन्मानाची वागणूक म्हणा अथवा पॉझिटिव्ह रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबतीत तालुका प्रशासन योग्य उपाययोजना करीत आहे.
रॅपिड अँटिजेन टेस्टला अल्प प्रतिसाद
नागरिकांनी कोरोनासदृश आजाराची लक्षणे दिसत असल्यास रॅपिड अँटिजेन टेस्टला स्वत:हून पुढे येणे गरजेचे आहे. कारण, त्वरित रिपोर्ट मिळत असल्यामुळे शंका दूर होतात. परंतु सध्या सर्वत्र अफवांमुळे रॅपिड अँटिजेन टेस्टला कमी प्रतिसाद मिळत आहे.
प्रशासनाला काम करण्यात अडचण
नागरिक आणि प्रशासन या नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येक कामात प्रशासनाला जनतेचे सहकार्य महत्त्वाचे असते. अफवांमुळे प्रशासन व जनतेत दुरावा निर्माण होण्याची शक्यता असून अशामुळेच तालुक्यात महसूल, पोलिस व नगर प्रशासनाला काम करताना अडचणी निर्माण होत आहेत.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये
तहसीलदार अंजली मरोड यांनी जनतेला आवाहन केले, की सध्या शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. शहरात काही ठिकाणी नागरिक रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घ्यायला विरोध करत होते. काल फक्त 40 रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आले. मी तालुक्यासाठी 500 किट आणले, परंतु अफवांमुळे जनतेचा प्रतिसाद कमी मिळत असून, नागरिक प्रशासनाला सहकार्य करताना दिसत नाहीत. जनतेने सत्य काय आहे हे समजून घ्यावे व अफवांवर विश्वास ठेवू नये.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.