मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, चालू गळीत हंगामात चार साखर कारखान्यांनी साडेबारा लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून साडेदहा लाख क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केले आहे. दरम्यान अद्यापही या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सुमारे दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाविना शिल्लक असून तो फेब्रुवारी अखेरपर्यंत गाळप होणार आहे. त्यानंतरच कारखाने बंद होणार असल्याची माहिती या साखर कारखान्यांच्या प्रशासनाने दिली.
नव्याने सुरू झालेल्या आष्टी (ता. मोहोळ) येथील कै. औदुंबर पाटील सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी वाघ यांनी कारखाना चालू गळीत हंगामात प्रायोगिक तत्वावर सुरू झाला आहे. तरीही 42 दिवसात एक लाख टन ऊसाचे गाळप करून 80 हजार क्विंटल साखर पोती उत्पादन केले आहे. कार्यक्षेत्रात अद्यापही 50 हजार मेट्रिक टन ऊस शिल्लक असून तो सर्व ऊस फेब्रुवारी अखेरपर्यंत गाळप होणार आहे. पुढल्या वर्षी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ऊस विकास योजना राबवणार असून हा कारखाना आदर्श मॉडेल बनविण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. सरासरी साखर उतारा 8.72 एवढा मिळाला आहे.
टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्याचे विस्तारीकरण झाले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस लागणार आहे. मात्र चालू वर्षी ऊस कमी असल्याने कारखान्याने 88 दिवसात 2 लाख 10 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून एक लाख 91 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. अद्यापही कार्यक्षेत्रात दहा हजार मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. तो फेब्रुवारी अखेरपर्यंत गाळप होणार आहे. सरासरी साखर उतारा 9.30 एवढा मिळाला आहे.
अनगर येथील लोकनेते ऍग्रो इंडस्ट्रीज या कारखान्याचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याने चालू गळीत हंगामात 112 दिवसात पाच लाख 43 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून, पाच लाख 37 हजार क्विंटल साखर पोती उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा 9.98 एवढा मिळाला आहे. कार्यक्षेत्रात गाळपाविना शिल्लक असलेला 40 हजार मेट्रिक टन ऊस फेब्रुवारी अखेरपर्यंत गाळप होणार आहे.
वटवटे येथील जकराया साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी चालू गळीत हंगामात कारखान्याने 106 दिवसात तीन लाख 90 हजार मेट्रिक टन ऊस गाळप करून दोन लाख 40 हजार क्विंटल साखर पोती उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा 9.50 एवढा आहे. कार्यक्षेत्रात अद्यापही 40 हजार मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. तो फेब्रुवारी अखेरपर्यंत गाळप करणार आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामात 80 लाख लिटर इथेनॉल उत्पादन केल्याचे सांगितले.
फळबागांकडे शेतकऱ्यांचा कल
विविध कारखान्यांकडे गाळपासाठी गेलेल्या ऊसाचे पैसे वेळेवर न मिळणे, रासायनिक खते व इतर महागाईच्या प्रमाणात ऊसाला दर न मिळणे, ऊस गाळपासाठी जाताना होणारे राजकारण याला कंटाळून शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे कानाडोळा केला आहे. परिणामी द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ या फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.