सांगली-मिरजेतील पंडितजींच्या दोन भेटी
सांगली-मिरजेतील पंडितजींच्या दोन भेटी  sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली-मिरजेतील पंडितजींच्या दोन भेटी

सकाळ वृत्तसेवा

सांगली : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सांगली जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर असे दोन वेळा आले होते. त्यापैकी १९६२ मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी आणि १९३७ मध्ये मिरजेत नातलगांच्या वैद्यकीय उपचारासाठी ते आले होते. सांगलीतील स्टेशन चौकातील गांधी पुतळ्याचीही त्यांनी पाहणी करून कौतुकाची थाप दिली होती.

पंडितजींच्या स्मृतींचा मागोवा घेताना येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लताताई देशपांडे म्हणाल्या, ‘‘माझे वडील जी. एस. देशपांडे यांची नेहरूंवर असिम श्रद्धा होती. ते काँग्रेसचे तेव्हाचे सांगलीचे पुढारी होते. १९६२ च्या सभेवेळी पक्षाचे ते सरचिटणीस होते. स्वामी रामानंद भारती अध्यक्ष होते. महाराष्ट्राचे नेते यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस लढत होती. ती सभा विलिंग्डन महाविद्यालयाच्या मैदानावर झाली होती.

तिसऱ्यांदा काँग्रेसने लोकसभा निवडणूक जिंकत सत्ता हस्तगत केली; मात्र पंडितजींसाठी ती शेवटचीच लोकसभा ठरली. या सभेत त्यांनी मंचावरील बैठ्या टेबलवर बसूनच भाषण केले होते. न कळत्या वयात त्यावेळी मी वडिलांसोबत कोल्हापूरच्या सभेलाही गेल्याचे स्मरते. या सभेनंतर विश्रामबाग येथील राजेसाहेबांच्या गेस्ट हाऊसमध्ये चहा-पाण्यासाठी ते आले होते. पंडितजीच्या स्मृती आम्ही आजही जपल्या आहेत. सांगलीच्या स्टेशन चौकात उभ्या केलेल्या त्यांच्या पुतळ्याचे मूळ कास्टिंग मॉडेल आमच्या शाळेच्या सभागृहात आम्ही जपून ठेवले आहे.’’

सांगलीतील सभेसाठी पंडितजी कोल्हापूरहून आले होते. त्यावेळी त्यांच्या वाहनांचा ताफा आताच्या शास्त्री चौकात अडवून सांगलीतील काही नागरिकांनी त्यांना हार अर्पण केला होता. भर रस्त्यात अडवून भारताच्या पंतप्रधानांना तेव्हा हार घातला जात होता. आजच्या काळात ही कल्पनाच वाटेल; पण तो काळ तसा होता. सांगलीतील सभा आटोपून ते कऱ्हाडच्या दिशेने गेले असता पेठ येथे काँग्रेसचे पुढारी आकाराम पाटील यांनी त्यांचे असेच भर रस्त्यात स्वागत केल्याची आठवण त्यांचे कनिष्ठ बंधू दिवंगत वकील वसंतराव पाटील यांनी सांगितली होती. पंडितजींची स्वातंत्र्यपूर्व काळातील भेट सांगलीत नव्हे तर मिरजेत होती, असे इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांनी सांगितले.

ते म्हणाले,‘‘पंडितजी मिरजेत मिशन रुग्णालयात आले होते. तेव्हा ते रेल्वेनेच आले असावेत. मिशन रुग्णालयात त्यांच्या जवळच्या नातलगाच्या उपचारासाठी ते आले होते. त्यावेळी ते मिरजेतील प्रसिध्द धन्वंतरी रामकृष्ण हरी भडकमकर यांच्या वाड्यात आले होते. लोकमान्य टिळकांचे अनुयायी असलेल्या डॉ. भडकमकर यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वट होता. ते त्या काळातील प्रसिध्द डॉक्टर होते. पंडितजींचे त्यांच्या घरी येणे, यातून त्यांचे स्थान स्पष्ट होते.’’

प्रतापगडावरही सांगलीकर

संयुक्त सातारा जिल्ह्यात सांगलीची ओळख दक्षिण सातारा जिल्हा अशी होती. द्विभाषिकातून स्वतंत्र महाराष्ट्र स्थापना होण्यापूर्वी ३० नोव्हेंबर १९५७ रोजी प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी पंडितजी आले होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा मोठा जोर होता. पंडितजींना काळे झेंडे दाखवण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण प्रतापगड ताब्यात घेतला होता. त्या आंदोलनासाठी सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक गेले होते, अशी माहिती विजय बक्षी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT