कोल्हापूर - तलाठी भरतीत मराठा आरक्षण किती टक्के द्यायचे? हे निश्चित नसल्यानेच परीक्षेचा निकाल राखून ठेवला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मार्गदर्शन मागितले आहे. ते जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यत हा निकाल राखून ठेवण्यात येणार आहे.
महसूल विभागाने तलाठीसह अन्य पदांसाठी परीक्षा झाली. याकाळात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण होते. हेच आरक्षण गृहित धरून प्रक्रिया पार पडली. परीक्षेचा निकालही तयार झाला, मात्र तो प्रसिद्ध केलेला नाही. परीक्षा होऊन सहा महिने झाले तरीही निकाल का प्रसिद्घ होत नाही? याबाबत परीक्षार्थी प्रतीक्षेत आहेत. संभ्रमावस्थेत आहेत. याबाबत महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले, की भरती प्रक्रिया सुरू असताना मराठा आरक्षणात बदल झाला आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
पूर्वी राज्य सरकारकडून मिळालेले आरक्षण १६ टक्के होते. नंतर हेच आरक्षण न्यायालयाच्या आदेशानुसार १३ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे मराठा समाजाला नेमके किती आरक्षण द्यायचे? हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. ७० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. त्याची लेखी परीक्षा झाली आहे, मात्र निकाल लागल्यानंतर मराठा समाजाच्या उमेदवारांना नेमक्या किती जागा द्यायच्या, याबाबत संभ्रमावस्था आहे. जोपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मार्गदर्शन मिळत नाही. तोपर्यंत निकाल जाहीर केला जाणार नाही. साधारण पंधरा-वीस दिवसांत हे मार्गदर्शन मिळेल.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत महसूल विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली आहे. यातही उमेदवारांना मराठा आरक्षण किती टक्के द्यायचे, हा मुद्दा उपस्थित झाला आहे. जाहिरात प्रसिद्ध करताना एक आणि नंतर एक अशा पद्धतीचा आरक्षणाचा निर्णय झाल्याने हा कळीचा आणि संभ्रमावस्था निर्माण करणारा पेच महसूल विभागात पुढे आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.