शिरोली पुलाची ( कोल्हापूर ) - मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जातून सरकारने महिलांना मुक्त करावे, तसेच पूरग्रस्तांना भरघोस मदत द्यावी, अन्यथा दहा दिवसांनी राष्ट्रीय महामार्गावर आत्मदहन करण्याचा इशारा छत्रपती शासन कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीतर्फे देण्यात आला.
शिरोली पंचगंगा पुलाशेजारील पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सुमारे अर्धा तास महिलांनी अडवला. तसेच कोल्हापूर-सांगली राज्य महामार्गावर शिरोली टोल नाका येथे सुमारे दोन तास या महिला ठिय्या मारून बसल्या होत्या. यावर निवासी नायब तहसीलदार दिगंबर सानप यांनी गुरुवारी (ता. 26) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी कोल्हापूर येथे बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानं तर आंदोलन मागे घेतले.
हेही वाचा - तो चिमणी बनून आगीवर नियंत्रण मिळवत राहिला...
मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत महिलांना कर्ज दिले आहे. मोलमजुरी करणाऱ्या महिलांनाही दीड ते दोन लाख कर्ज आहे. उत्पन्न कमी आणि कर्ज जादा अशी अवस्था झाली आहे. विशेषतः शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात महापुरामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यातच मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुलीला जोर लावला आहे. प्रसंगी महिलांना दमदाटी करणे, शिवीगाळ करणे, असे प्रकार सुरू आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जे माफ करावीत, महिलांना शासकीय योजनांतून कर्ज पुरवठा करावा, पूरग्रस्तांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, आदी मागण्या छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीन मुख्यमंत्र्यांकडे केली होती; मात्र प्रशासनने लक्ष न दिल्याने आज पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चूल पेटवून स्वयंपाक रस्त्यावर करण्याचा निर्णय घेतला होता. आज सकाळी अकराच्या सुमारास महिला आघाडी प्रमुख दिव्याताई मगदूम यांच्या नेतृत्वाखाली महिला शिरोलीकडे जात होत्या. यावेळी जमाव बंदी आदेश असल्यान पोलीस प्रशासनान महिलांना कोल्हापूर सांगली मार्गावरील शिरोली टोल नाक्याजवळ अडवले. आंदोलनासाठी जाऊ न दिल्याने महिला संतप्त झाल्या. त्यांनी घोषणाबाजी केली.
हेही वाचा - निपाणी घरफोडीत पाच लाखांचा ऐवज लंपास
अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, डीवायएसपी किशोर काळे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण यश आले नाही. यावेळी नायब तहसीलदार दिगंबर सानप घटनास्थळी आले. त्यांनी तोंडी आश्वासन देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त महिलांनी घोषणाबाजी करत पुन्हा रस्त्यावर ठाण मांडले. यामुळे अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी नायब तहसीलदार सानप यांना खडे बोल सुनावत आणि जबाबदारीने उत्तरे द्या, असे सांगितले. यानंतर 26 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या समक्ष बैठक बोलवण्याचे लेखी आश्वासन सानप यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले. न्याय न मिळाल्यास राष्ट्रीय महामार्गावर आत्मदहन करण्याचा इशारा मगदूम यांनी दिला. यावेळी बिसमिल्ला दानवाडे, मनीषा कुंभार, स्वाती माजगावे, समीर दानवाडे, अकसर सनदी, अमोल कुंभार यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.
महिलांनी आंदोलन करू नये, यासाठी पोलिसांनी सांगली फाट्यावर बंदोबस्त ठेवला होता ; मात्र काही महिलांनी गनिमी काव्याने तावडे हॉटेल याठिकाणी आल्या. महामार्गावर येऊन त्यांनी थेट संसार मांडला. महिला पोलिसांनी आंदोलक महिला हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र जो पर्यंत आमच्या मागण्यांसदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर केला आणि या महिलांना ताब्यात घेतलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.