पिंपरी, ता. ९ : शासन निर्णयाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना हक्काचा परतावा देण्यास पीएमआरडीए कटिबद्ध असल्याची ग्वाही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) जमीन व मालमत्ता विभागाचे सहआयुक्त हिम्मत खराडे यांनी दिली.
आकुर्डीतील ग. दि. माडगुळकर सभागृहात मंगळवारी जमीन परताव्याबाबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संवाद मेळावा घेण्यात आला. १०६ शेतकऱ्यांना ६.२५ टक्के जमीन परताव्याचा लाभ व्हावा, या दृष्टिकोनातून पीएमआरडीएतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत १७ शेतकऱ्यांना परतावा देण्यात आला आहे. दोन प्रकरणांत कागदपत्रांबाबत नोटीस, एकावर सुनावणी, तर पाच प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. २९ प्रकरणांत संबंधितांना त्रुटीबाबत कळविण्यात आले आहे, अशी माहिती खराडे यांनी दिली.
या मेळाव्यात तहसीलदार अभिजित जगताप, विशेष भूसंपादन अधिकारी विठ्ठल उदमले, तसेच दृकश्राव्य माध्यमातून भूसंपादन समन्वय अधिकारी कल्याण पांढरे, संगीता राजापूरकर-चौगुले आदी उपस्थित होते. १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना परतावा प्राधान्यक्रमाने मिळावा, या उद्देशाने आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांच्या निर्देशानुसार संवाद मेळावा घेण्यात आला.
या प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना दाखले वितरित करण्यात आले असून उर्वरित अर्जदारांसाठी २५ व २६ सप्टेंबरला विशेष शिबिर घेण्यात येणार असल्याचे पांढरे यांनी सांगितले. यावेळी निगडी, चिखली, मोशी, रहाटणी, रावेत, आकुर्डी आदी गावांतील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची कार्यपद्धती समजून घेत त्यासाठी लागणारे कागदपत्रे, आपल्या अडचणी आणि त्यावर नियमानुसार काय उपाय आहेत यावर चर्चा करण्यात आली.
संवाद मेळाव्यात ॲड. राजेंद्र काळभोर यांच्यासह अनेकांनी वेगवेगळ्या अडचणी मांडल्या तसेच सूचना केल्या.
---
आवश्यक लागणारी कागदपत्रे
- विहित नमुन्यात अर्ज
- संपादनापुर्वी आणि नंतरचा ७/१२ उतारा व फेरफार
- मुळ जमीन मालक मयत असल्यास मृत्युचा दाखला व दिवाणी कोर्टाचे वारस प्रमाणपत्र
- विशेष भूसंपादन अधिकारी यांच्याकडील भूसंपादन दाखला
- भूमिसंपादन कायदा १८९४ चे कलम १८,२८,३० नुसार मोबदल्यात वाढ करण्याबाबत संपादनाबाबत कोणत्याही कोर्टात दावा दाखल केले नसल्याबाबत व वारसाबाबत १०० रुपये स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र.
- ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर केलेले क्षतीपुर्ती बंधपत्र
------------