पिंपरी, ता.२७ ः सध्या सुरू असलेल्या औषधनिर्माण (फार्मसी) शाखेच्या प्रवेश प्रक्रियेत विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) कडून महाविद्यालयांची तपासणी आणि मान्यता मिळण्यामध्ये विलंब होत असून राज्य सीईटी सेलची संथ गती आणि अनेक अभ्यासक्रमांची नोंदणी सुरू असल्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. त्यांच्या शैक्षणिक नुकसानीची शक्यता आहे. दुसरीकडे खासगी विद्यापीठांचे वर्ग लवकर सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात लागून तीन महिने उलटले. तरीही सीईटी सेलकडून प्रवेशाचे वेळापत्रक उशिरा जाहीर झाले आहे. वारंवार मुदतवाढ दिल्याने विद्यार्थी आणि पालक गोंधळलेले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून मान्यता प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे महाविद्यालयांना वेळेवर प्रवेश सुरू करता आलेले नाहीत. यंदाही हीच परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दिवाळीनंतरच प्रवेशाला सुरुवात होईल, असा अंदाज शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत असून प्रक्रिया डिसेंबरपर्यंत लांबेल, अशी भीती आहे. त्यामुळे पहिल्या सत्रातील परीक्षा पुढे ढकलावी लागण्याची चिन्हे आहेत.
सलग दुसऱ्यावर्षीही उशीर
मागील वर्षीही प्रवेश प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे फार्मसीच्या ५८ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. अनेक विद्यार्थ्यांनी पर्याय म्हणून इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. यंदाही तीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवेश प्रक्रियेत होणाऱ्या सततच्या विलंबामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरवर्षी उशीर होतो, यामुळे आमचं शैक्षणिक वर्ष वाया जाते. भविष्यातील करिअर धोक्यात येतंय, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. सरकार व ‘पीसीआय’ने एकदाच ठोस धोरण ठरवावे, जेणेकरून दरवर्षी हा गोंधळ होणार नाही, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
डिप्लोमा फार्मसी अभ्यासक्रमाची फक्त गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. अद्याप कॅप फेऱ्या जाहीर न केल्यामुळे प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार ? असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. आता दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होतील. फार्मसीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश प्रक्रिया वेळेवर न झाल्यास थेट उद्योगक्षेत्रालाही फटका बसतो. कारण, औषधनिर्मिती व वैद्यकीय क्षेत्रात कुशल पदवीधरांची गरज प्रचंड आहे. अशावेळी प्रवेश प्रक्रियेत होणारा उशीर हा राष्ट्रीय पातळीवरही गंभीर मुद्दा आहे.’’
- डॉ.संजीव देशपांडे, प्राचार्य, डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आकुर्डी
‘‘सध्याच्या परिस्थितीकडे पाहता फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेला लागलेला उशीर हा केवळ औपचारिकता नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी निगडीत गंभीर प्रश्न आहे. वर्षभराचा अभ्यासक्रम सहा महिन्यांत पूर्ण करण्याची वेळ आल्यास शिक्षणाची गुणवत्ता कमी होणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक गडबडीत पार पडल्यास विद्यार्थ्यांचा ताण वाढणार आहे. सततची अनिश्चितता राहिल्यास फार्मसी अभ्यासक्रमावरील विद्यार्थ्यांचा विश्वास कमी होण्याचा धोका आहे.
- डॉ. नीरज व्यवहारे,