Diwali  esakal
प्रीमियम ग्लोबल

Diwali :जाणून घ्या इतिहासातील दिवाळी कशी होती?

पेशवेकाळ आणि संत परंपरेत देखील हा सणाचे संदर्भ सापडतात.

Shraddha Kolekar (श्रद्धा कोळेकर)

शनिवारवाड्यात आता दीपोत्सवाच्या निमित्ताने जेवढे दिवे लावले जातात त्याहीपेक्षा अधिक दिवे हे पेशवेकाळात लागत होते. त्यावेळची फटाक्यांची नावे देखील रंजक होती. चंद्रज्योती, निळे सिंगटी, फुलबाज्या. "राजश्री पंत नाना स्वामिंनी खेलावयास जिनस आतसबाजी आणले" हा उल्लेख १७४० सालचा आहे, अशी माहिती इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी दिली.

भारतात दिवाळीचा सण हा फार पूर्वीपासून साजरा केला जातो आहे. दीपोत्सव हा सण ज्याचे संदर्भ पुराणकथांमध्ये देखील आढळून आले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पेशवेकाळ आणि संत परंपरेत देखील या सणाचे संदर्भ सापडतात.

सवाई माधवराव यांच्यासाठी पर्वतीवर आतषबाजी

महादजी शिंदे यांनी राजस्थानातील कोटा येथे होणाऱ्या आतषबाजीचे वर्णन पुण्यात येऊन सांगितले. त्यानंतर अशी मजा सवाई माधवराव पेशवे यांच्या देखील नजरेस पडावी अशी मागणी झाल्यावर पुण्यात आठ ते दहा दिवस त्याची तयारी शिंदे यांनी केली.

त्यानंतर महादजी शिंदे यांनी सवाई माधवराव यांच्यासाठी पर्वतीवर मोठ्या प्रमाणात आतषबाजी आयोजित केली होती. ही आतषबाजी पाहण्यासाठी अनेक लोक संध्याकाळच्या वेळी पर्वती परिसरात बसले होते, अशी माहिती मंदार लवाटे यांनी दिली.

फटाके पाहायला लोकं तिकीट काढून येत असत

अठराव्या शतकाच्या आधी लंडनच्या किस्टल राजवाड्यात चार्ल्स टॉमस बॉक यांनी सुरू केलेली शोभेच्या दारूकामाची प्रथा ७० वर्षे चालू राहिली होती.

सुरूवातीच्या काळात शब्द आणि चित्रे व नंतर व्यक्तिचित्रे रेखाटणारे दारूकाम त्या काळात झाले. हे दारूकाम म्हणजेच फटाक्यांतून बनणाऱ्या कलाकृती पाहण्यासाठी ८० हजारांपर्यंत प्रेक्षक तिकिटे काढत असत. . (संदर्भ - मराठी विश्वकोश )

लष्करी कार्यवाहीसाठी शोभेच्या दारूचा उपयोग केला जात असे

एखादे क्षेत्र प्रकाशमान करण्यासाठी तेजस्वी प्रकाश आणि संदेशवहनासाठी सांकेतिक रंगीत प्रकाश किंवा धूर निर्माण करणे याचा लष्करी कामांसाठी उपयोग केला जात असे. रशियातील पहिल्या निकोलस यांनी ऑस्ट्रियन आघाडीवर वॉर्सापासून सेंट पीटर्झबर्गपर्यंत संदेशवहनासाठी शोभेच्या दारूकामाच्या २२० स्थानकांची प्रणाली उभारली होती.

विविध गटांमधील पूर्वनियोजित संकेतांसाठी प्रकाश उत्सर्जक व धूम्रकारी पदार्थ वापरून संदेशवहनासाठीही शोभेची दारू वापरण्याचे प्रयोग झाले. त्याचप्रमाणे युद्धकाळात विमान उतरविताना धावपट्टी प्रकाशमान करण्यासाठी छत्रीयुक्त ज्योती, तर रणक्षेत्र उजळण्यासाठी चांदण्या निर्मिणारे गोळे वापरले जात असे. (संदर्भ - मराठी विश्वकोश )

भांडारकर रिसर्च इन्स्टिटयूट (Bhandarkar Research institute )आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलेल्या संस्कृत विषयातील प्राध्यापिका आणि वैदिक विषयात संशोधन करणाऱ्या डॉ.सुचेता परांजपे यांनी 'सकाळ' शी या विषयाबाबत संवाद साधला.

वैदिक वाङ्मयात अश्वायुजी किंवा नवान्नपौर्णिमा या यज्ञांचा उल्लेख

डॉ. परांजपे म्हणाल्या, " वैदिक वाङ्मयात अश्वायुजी किंवा नवान्नपौर्णिमा या यज्ञांचा उल्लेख येतो. दिवाळी हा त्याच्या जवळ जाणारा सण आहे जेव्हा शेतात नवीन धान्य येतं. कामसूत्र यक्षरात्री या नावाने कुबेर पूजेचा म्हणजेच लक्ष्मी पूजनाचा उल्लेख येतो. रामायणात आणि महाभारतात दिवाळी या शब्दाचा उल्लेख नसला तरीही त्याचे बीजरूप आहे असे म्हणता येईल. "

अकराव्या शतकानंतर 'दिवाळी' चा मराठीत उल्लेख

"अकराव्या शतकात 'दिवाळी वीतल्या' ' असा पहिला उल्लेख मराठीत येतो. याच काळात जे लीळा चरीत लिहिलं गेलं त्यात भाऊबीजेचे वर्णन येते. चतुर्वर्ग चिंतामणी किंवा नीलमतपुराण यात दिवे कसे लावावे याचे वर्णन येते. पाडव्याच्या जी बलीची कथा आहे, ज्यात वामनावतार आहे त्याच्यासाठी बलिप्रतिपदा तोही उल्लेख पुराणात आलेला आहे.

दिवाळीचा स्पष्ट उल्लेख हा अकराव्या शतकानंतर स्पष्ट दिसतो पण त्याच्या आधी दीपोत्सवाचा उल्लेख आहे" असे डॉ. परांजपे सांगतात.

रामदास स्वामी आणि संत एकनाथ महाराज यांच्या लिखाणात फटाक्यांचा उल्लेख

डॉ. परांजपे म्हणाल्या, रामदास स्वामींनी रामायणाचे वर्णन करताना फटाक्यांचा उल्लेख त्यांच्या श्लोकांमध्ये केला आहे. तसेच संत एकनाथ महाराजांनी देखील फटाक्यांचा उल्लेख केला आहे. "भरुनी रजतम औषध, करुनि अग्नियंत्र संनद्ध" असा उल्लेख आढळतो.

पण त्यांचा काळ येईपर्यंत दरम्यानच्या काळात गनपावडरचा शोध लागला होता. त्यामुळे त्यांनी वर्णन म्हणून फटाके घेतलॆ आहेत. प्रत्यक्ष रामायणात फटाक्यांचा उल्लेख दिसून आलेला नाही.

शिवाजी महाराजांच्या काळातही फटाके होते..

शिवाजी महाराजांचा इतिहास हा सोळाव्या शकतील आहे. त्याच्याही आधी फटाके आढळून आले आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात फटाके असूनही फटाके उडविल्याचा उल्लेख इतिहासात आढळत नाही. याचा अर्थ फटाक्यांचे अस्तित्व नव्हते असे नाही असे डॉ. परांजपे सांगतात.

दरम्यान याबाबत मंदार लवाटे म्हणाले, "१२०० ते १७०० च्या काळात फटाक्यांची निर्मिती केलेले संदर्भ कागपत्रात आढळत नाहीत पण संतांच्या काव्यात याचा उल्लेख आढळून येतो. इतिहासात जरी फटाक्यांचा उल्लेख असला तरीही जे इतिहासात आहे ते आहे तसेच आपण सगळेच स्वीकारले नाही. आपण सतीची प्रथा स्वीकारली नाही.

तसेच आज सर्वच राज्यातील हवा प्रदूषणाची पातळी पाहता आपण फटाके उडविणे हे आपल्याच आरोग्यास हानिकारक ठरू शकते . आज प्रदूषणामुळे कृत्रिम पाऊस, शाळा बंद इथपर्यंत आलो आहोत. बाकीचे प्रदूषण कमी करणे आपल्या हातात नसले तरीही फटाक्याने होणारे प्रदूषण कमी करणे हे प्रत्येकाच्या हातात आहे."

----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT