marathi geet of shantabai shelke
marathi geet of shantabai shelke esakal
साप्ताहिक

साजणी बाई येणार साजण.. स्त्री भावविश्व उलगडणारे शांताबाईंचे गीत

साप्ताहिक टीम

शालू हिरवा...

हेमंत गोविंद जोगळेकर

शालू हिरवा, पाचू नि मरवा वेणी तिपेडी घाला

साजणी बाई येणार साजण माझा!

...

चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ ग

लुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ ग

रेशिमधागे ओढिती मागे, व्याकुळ जीव हा झाला

...

मंगलवेळी मंगलकाळी, डोळा का ग पाणी?

साजण माझा हा पतिराजा मी तर त्याची राणी

अंगावरल्या शेलारीला बांधीन त्याचा शेला

मागच्या लेखांकात (नववधू प्रिया मी बावरते, सकाळ साप्ताहिक, प्रसिद्धी २३ डिसेंबर २०२३) आपण भा.रा. तांबे यांच्या ‘बाबरलेल्या’ नववधूचे गीत आस्वादले होते.

ते नववधूचे गीत असले तरी त्याला मंगलगीत म्हणता येणार नाही; कारण ते होते अप्रत्यक्षपणे मृत्यूला उद्देशून.

सकाळ साप्ताहिकच्या या विवाह विशेषांकात मात्र आपण एक खरोखरीचे मंगलगीत आस्वादूया. हे आहे शांता शेळके यांचे शालू हिरवा...

या गीताची निवेदिका अगदी आनंदाने आपल्या सख्यांना आपला वधूचा साजशृंगार करून द्यायला सांगत आहे. हा आहे वधूचा अगदी पारंपरिक शृंगार. तिला हिरवा शालू नेसायचा आहे. तिपेडी वेणी गुंफून हवी आहे.

पाचू आणि मरवा ल्यायचा करायचा आहे. तिच्या गोऱ्या कपाळावर जाळी चढवून माला घालायची आहे. इतका सगळा शृंगार करायचा आहे, कारण तिचा साजण येणार आहे.

असे सगळे आनंदाचे वातावरण आहे; पण त्याचवेळी तिला आठवत आहेत भातुकलीच्या खेळातली इवली इवली चूलबोळकी.

येथे शांताबाई 'इवली इवली’ हे विशेषण वापरून केवळ त्या चूलबोळक्यांचा छोटा आकार दर्शवीत नाहीत, तर तिच्या बालपणाची सारी निरागसता त्या चूलबोळक्यांत भरतात.

तिचे ते निरागस बालपण आता हरपणार असल्याची जाणीव मग तिच्या इतकीच आपल्यालाही व्याकूळ करून सोडते.

आता स्वतःचा संसार सुरू करण्याची वेळ आल्यावर, इतकी वर्षे उपभोगलेले लाडाकोडाचे आयुष्य भातुकलीचा लुटूपुटीचा खेळच होता ही जाणीव होते.

आजवर आपले म्हटलेले आपले घर, आपली माणसे आता सोडून नव्या जगात जायचे आहे. आपल्यांच्या प्रेमाचे रेशीमधागे तिला मागे ओढत आहेत. त्याची खंत दडपून टाकण्यासाठी, मग ती लग्न समारंभाच्या थाटामाटाचे वर्णन करते.

सनईचे मंगलसूर निनादत आहेत. दारी चौघडा वाजत आहे आणि नवरदेवाची स्वारी वाजत गाजत, ऐटीत घोड्यावरून मिरवत मिरवत येणार आहे. तरी अशा मंगलवेळी आपण आपल्या डोळ्यात पाणी का येऊ द्यावे, असे ती स्वतःलाच विचारते आहे.

खरं म्हणजे, आपल्या पतिराजाची आपण आता राणी होणार आहोत; पण आपल्या माहेरच्या प्रियजनांच्या होणाऱ्या वियोगाचे दुःख तिला होते आहे.

एकदा का साजणाच्या शेल्याला आपल्या शालूच्या पदराची गाठ मारली, की आपले सारे दुःख दूर होईल अशी ती स्वतःची समजूत घालते आहे.

आपल्या अंतर्मनातले दुःख बाजूला सारण्यासाठी ती पुन्हा पुन्हा आनंदाचे वर्णन करून राहिली आहे; पण तिचे हे अट्टाहासाने वर्णन करणेच तिचा सल तिने न सांगताच आपल्यापर्यंत पोहोचवते. या गीतातून शांताबाई अत्यंत सूचकपणे तो व्यक्त करतात.

शांताबाईंनी सर्व साहित्य प्रकार समर्थपणे लिहिले आहेत. कथा, कादंबरी, अनुवाद, चित्रपटकथा, लघुनिबंध, बालसाहित्य - पण त्या खुलल्या आहेत त्या कवितालेखनात. कवितेच्याही सर्व प्रकारांत त्यांनी लेखणी वावरली आहे.

वृत्तबद्ध कविता, मुक्तछंदातील कविता, कवितांचे अनुवाद, लावण्या, त्रिपदी, हायकू, बालगीते, नाट्यगीते, चित्रपटगीते आणि स्वतंत्र भावगीते. खरेतर, गीते विशेषतः चित्रपटगीते दिलेल्या प्रसंगावर रचलेली असतात.

(बऱ्याचदा) कवीला स्वतंत्रपणे सुचलेली नसतात. पण शांताबाईंची सर्वच गीते कमालीची उत्कट असतात, त्यांनाच मुळातून सुचलेली असावीत अशी. कोणत्याही गीतात त्या गीताला साजेसे शब्द शब्दप्रभू शांताबाई नेमकेपणाने वापरतात.

गीतातील निवेदकाच्या भावना अत्यंत समरसून व्यक्त करतात. त्यांच्या गीतांतून विविध रसांचा परिपोष केलेला असतो. शांताबाईंच्या विविध गीतांतून वेगवेगळ्या भावना - विशेषतः स्त्रीच्या भावविश्वातल्या - विलक्षण प्रत्ययकारी होऊन आपल्या मनाला भिडतात.

शांताबाईंच्या गीतलेखनाची जादूच अशी आहे, की शालू हिरवा... गीतातील नायिकाही आपल्यालाच मनोमन दिसू लागते आणि तिच्याबद्दलच्या मायेने मन भरून येते.

----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT