नारायणगाव : पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत बदली करण्यात आलेले कर्मचारी व अधिकारी विहित वेळेत बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास त्यांचा ऑगस्टचा पगार काढता येणार नाही. नोकरीत सेवाखंड पडेल. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. या बाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
महालसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. नारायणगाव येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एक महिन्यांपूर्वी ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या आहेत. तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. काही ग्रामसेवक व आरोग्य कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचा प्रश्न या वेळी पत्रकारांनी उपस्थित केला.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद म्हणाले, जिल्हा परिषदे अंतर्गत ७३ प्रवर्ग आहेत. कालमर्यादा पूर्ण झाल्यामुळे अथवा विनंती नुसार काही कर्मचारी व अधिकारी यांच्या बदल्या एक महिन्या पूर्वी करण्यात आल्या आहेत. या मध्ये ग्रामसेवकाचा समावेश आहे. बदली आदेश झाल्यानंतर रुजू होण्यासाठी विहित कालावधी असतो. या कालावधीत रुजू न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचा जुन्या ठिकाणी पगार काढता येणार नाही. पगार काढल्यास आर्थिक अनियमितता झाल्यास वसुली व अन्य कारवाईस कर्मचारी व पगार काढणारा अधिकारी कारवाईस पात्र राहील.
बदली झालेल्या कर्मचाऱ्याचा ऑगस्टचा पगार रुजू झाल्यानंतर नवीन ठिकाणी काढला जाणार आहे. विहित कालावधीत रुजू न होणारे ग्रामसेवक व अन्य कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी महादेव फुले यांनी जारी केले आहेत. बदली आदेशाची कार्यवाही वेळेत करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी ताबडतोब हजर होण्याचे आवाहन या वेळी प्रसाद यांनी केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.