पुणे

टिळक-गोखले यांना गांधींशी जोडणारे पुणे!

अरुण खोरे

शहरातील भारत सेवक समाज, फर्ग्युसन कॉलेज, येरवडा कारागृह, ससून इस्पितळ, आगाखान पॅलेस, पर्णकुटी बंगला, पुणे स्टेशनजवळील निसर्गोपचार केंद्र आणि नंतर उरुळी कांचनमधील निसर्गोपचार केंद्र  ही स्थळे महात्मा गांधींशी जोडल्या गेलेली आहेत.

महात्मा गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील आणि भारतातील सामाजिक-राजकीय जीवनाला दिशा देणारे गोपाळ कृष्ण गोखले पुण्याचे आणि गांधींनी ज्यांच्याकडून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे घेतली, ते लोकमान्य टिळकही पुण्याचेच. ‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्रात गांधीजींनी आपण दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यावर मुंबई आणि पुण्यामध्ये कोणाकोणाला भेटलो, याची माहिती दिली आहे. हा दौरा साधारणतः २६ सप्टेंबर १८९६ ते १६ नोव्हेंबर १८९६ या काळात झाला. मुंबईमध्ये न्या. महादेव गोविंद रानडे यांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि फिरोज शहांना भेटण्याचा सल्ला दिला, असे गांधींनी नमूद केले आहे. १२ ऑक्‍टोबर १८९६ रोजी पुण्यात गांधीजींनी लोकमान्य टिळक, त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात प्रोफेसर गोखले आणि नंतर सर रामकृष्ण भांडारकर यांच्या भेटी घेतल्या. 

यानंतर भारत सेवक समाजाच्या मागील जागेत फर्ग्युसन टेकडीवर गोखले यांना गांधी भेटले. या भेटीबाबत त्यांनी जो प्रतिसाद नोंदविला आहे, तो आपल्याला गांधींच्या आत्मकथेत वाचायला मिळतो. गांधी लिहितात - ‘सर फिरोज शहा मला हिमालयासारखे वाटले,  लोकमान्य समुद्रासारखे वाटले, गोखले गंगेसारखे वाटले. तिच्यात मला स्नान करता येण्यासारखे होते. राजकीय क्षेत्रामध्ये जे स्थान गोखल्यांनी जिवंतपणी माझ्या हृदयात व्यापले व देहावसान झाले तरी अजूनही व्यापून राहिले आहेत, ते स्थान दुसऱ्या कोणीही पटकावलेले नाही.’ पुण्यातील भारत सेवक समाजाच्या कामात गांधींनी यावे, असे गोखले यांना वाटत होते. या सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की काँग्रेसमधील टिळक आणि गोखले या दोन गटांपैकी नेमस्त अथवा मवाळ गटाच्या गोखले यांच्याबरोबरची वाट गांधींनी स्वीकारली.स्वातंत्र्य आंदोलनातील असहकार चळवळीच्या काळात गांधीजी १९२२ ते २४ या काळात येरवडा कारागृहात होते. या काळात गांधीजींना ॲपेंडिक्‍सचा त्रास सुरू झाला. त्यांना १२ जानेवारी १९२४ रोजी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. ॲपेंडिक्‍सची शस्त्रकिया वीस मिनिटांत पार पडली. 

येरवड्यातील उपोषण
गांधीजींचा सर्वांत मोठा वैचारिक, सामाजिक व राजकीय संघर्ष जो झाला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर. ब्रिटिशांनी अस्पृश्‍यांसाठी वेगळे मतदारसंघ असलेला जातीय निवाडा जाहीर केल्यावर गांधीजींनी त्याला विरोध केला आणि आमरण उपोषण येरवडा कारागृहात सुरू केले. संपूर्ण देशभर याचे पडसाद उमटू लागले. शेवटी स्वतंत्र मतदारसंघांऐवजी संयुक्त मतदारसंघांचे आरक्षण दिले जावे, हा तोडगा गांधीजींनी मान्य केला. यानंतर येरवडा कारागृहात ‘पुणे करार’ झाला आणि डॉ. आंबेडकरांनी त्यावर सही करून देशातील एक मोठा तणाव आणि संघर्ष संपवला. (पुणे करार, दि. २४ सप्टेंबर १९३२). गांधींनी उपोषण सोडावे, यासाठी कोलकत्याहून गुरुदेव टागोर पुण्यात आले होते आणि त्यांनी नंतर पुण्यात झालेल्या जाहीर सभेत भाषणही केले. ‘चले जाव’ आंदोलनानंतर गांधीजी, कस्तुरबा, महादेवभाई देसाई यांना पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये बंदीवासात ठेवण्यात आले. हा कालखंड ऑगस्ट १९४२ ते मार्च १९४४ असा साधारण पावणेदोन वर्षांचा होता. या पॅलेसमध्येच २२ फेब्रुवारी १९४४ रोजी गांधींच्या सहवासात कस्तुरबांनी अखेरचा श्‍वास घेतला. कस्तुरबांच्या पार्थिवाचे दहन केले आणि तेथेच नंतर त्यांची समाधीही उभारण्यात आली. आज आपल्याला आगाखान पॅलेसच्या मागील प्रांगणात गांधीजींचे पुत्रसमान सचिव महादेवभाई देसाई आणि कस्तुरबा यांच्या समाधीची दोन तुळशी वृंदावने आहेत.

हिमानी सावरकर म्हणाल्या
गांधी हत्या कटातील आरोपी गोपाळ गोडसे यांच्या घरी १९५५  ते ६० च्या दरम्यान गांधीजींचे एक नातू आमची विचारपूस करण्यासाठी आले होते, अशी माहिती सुमारे सहा वर्षांपूर्वी स्वा. सावरकरांच्या नातसून आणि गोपाळ गोडसेंच्या कन्या (कै.) हिमानी सावरकर यांनी मला पुण्याच्या शनिवार पेठेतील त्यांच्या घरी झालेल्या चर्चेत दिली होती. एकूणच, गांधीजींच्या मरणोत्तर असलेले हे संबंधही मला विशेष महत्त्वाचे वाटतात आणि गांधीजींच्या व्यापक करुणामयी, मानवतावादी विचारांचा मार्गच शेवटी सुयोग्य आहे, याची खात्री पटते.

अरुण खोरे
arunkhore@hotmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT