केंद्र आणि राज्य सरकारने वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्याने दुचाकी व कारचालक काहीसे सुखावले आहेत.
पुणे - केंद्र आणि राज्य सरकारने वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्याने दुचाकी व कारचालक काहीसे सुखावले आहेत. मात्र, सीएनजी वाहन असलेल्यांना अजूनही दरवाढीचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने ब्रेक घेतला असला, तरी ‘सीएनजी’च्या दरवाढीची गाडी मात्र सुसाट आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत पुण्यात ‘सीएनजी’चे दर २२.०८ रुपयांनी वाढले आहेत.
एक एप्रिल रोजी शहरात सीएनजी ६२.२० रुपये प्रतिकिलो होता. आता तो ८५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. २०२० मध्ये अनलॉक सुरू झाल्यानंतर सातत्याने इंधनाचे दर वाढत होते. सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत होते. मात्र, तेव्हा ‘सीएनजी’चे दर स्थिर होते. परंतु, काही दिवसांनी सीएनजीदेखील महाग होत गेले. इतर इंधनाच्या किमती वाढत असल्याने जुलै २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान अनेकांनी त्यांचे पेट्रोलवरील वाहन सीएनजी करून घेतले. मात्र, जानेवारी २०२१ नंतर या वाहनचालकांनादेखील इंधन दरवाढीचा सामना करावा लागला. दोन जानेवारी २०२१ रोजी सीएनजी ५५.५० रुपये किलो होते. तेच डिसेंबर २०२१ पर्यंत ६३.९० रुपयांवर पोचले होते.
दिलासा मिळाला, पण...
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींना वैतागून पर्यायी इंधन म्हणून सीएनजीचा वापर सुरू केलेल्या आणि आधीपासूनच सीएनजी वापरत असलेल्या वाहनचालकांना एक एप्रिल रोजी मोठा दिलासा मिळाला होता. सीएनजीवरील व्हॅट १० टक्क्यांनी कमी केल्याने दर प्रतिकिलो ६.३० रुपयांनी कमी झाले होते. तेव्हा सीएनजीची किंमत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ६२.२० रुपये प्रतिकिलो झाली होती. मात्र, आधीच्या दिवशी सीएनजी अडीच रुपयांनी महागला होता.
१ जून २०२० रोजी मी गाडी घेतली, तेव्हा सीएनजी ५५ रुपयांना होता. आता तो ८५ रुपये झाला आहे. म्हणजे दोन वर्षांत ३० रुपयांनी किंमत वाढली. मात्र, त्या तुलनेत मला माझ्या कारमधून मिळणारे उत्पन्न वाढलेले नाही. बाकी सर्व वस्तूंच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गाडीचा धंदा आता परवडत नाही. गाडी उभी ठेवली तर हप्ता कसा भरायचा?
- बैकुंठ ओझा, कॅब व्यावसायिक
राज्य आणि केंद्र सरकारने दोनदा पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी केल्या, ही चांगली बाब आहे. मात्र, त्यामुळे वाढलेली महागाई अद्याप कमी झालेली नाही, तसेच १० रुपयांनी दर वाढवून तो पाच रुपयांनी कमी करण्यात काहीच अर्थ नाही. सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे.
- प्रियांका साबळे, वाहनधारक लघुउद्योजक
दरवाढीची कारणे काय?
आयात करण्यात येत असलेल्या गॅसची किंमत वाढली
स्थानिक गॅसही महागला
स्थानिक गॅसची कमतरता आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.