पुणे

अकरावी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेसाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे : अकरावीच्या प्रवेशासाठी संपूर्ण राज्यात एक सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या परीक्षेचे आयोजन करण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. दहावीचा निकाल साधारणत: १५ जुलै दरम्यान घोषित होण्याची शक्यता आहे. या निकालानंतर दोन आठवड्यांनी म्हणजेच जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ‘सीईटी’ परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

या समितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि बालभारतीचे संचालक दिनकर पाटील, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे हे सदस्य असणार आहेत. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. अकरावीची सीईटी परीक्षा राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राज्य मंडळ, सीबीएसई, सीआयएससीई आणि सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे अशा सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.

शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली राज्य शिक्षण मंडळ आणि परीक्षा परिषदेमार्फत ‘सीईटी’ परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ आणि परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येतील. दहावीचा निकाल लागल्यानंतर संबंधित पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क दिल्याने सीईटी परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. परंतु राज्य मंडळाव्यतीरिक्त अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना शुल्क द्यावे लागणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी दिलेल्या सीईटी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल. या प्रवेशनंतर महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या उर्वरित जागांवर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या मुल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे.

असे असेल सीईटीचे स्वरूप :

- ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असेल.- राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल

- प्रश्न पत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे विषयावर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील

- परीक्षा ऑफलाइन होईल

- प्रश्न पत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल

- १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका

- परीक्षेचा कालावधी : दोन तास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘मराठा आंदोलनामुळे दरदिवशी मोदींची सभा’

आपण सगळे भारतीय आहोत!

लस, गैरसमज आणि आव्हान!

Neeraj Chopra : अवघे 2 सेंटीमीटर... नीरज टॉप स्पॉटपासून थोडक्यात हुकला

जगणं शिकवणारा बापमाणूस!

SCROLL FOR NEXT