कडूस (पुणे) : खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात विद्युत पंप व केबल चोरीचे प्रमाण वाढले आहे. चक्रीवादळ व कोरोना महामारीच्या संकटात जगायची चिंता सतावत असताना विद्युत पंपांच्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
चासकमान धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यामुळे पाण्याची सोय झाल्याने खेड तालुक्याच्या उत्तर व पूर्व पट्ट्यात उन्हाळी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. विहीर, कालवा, नदीवर विद्युत पंप बसवून शेतकरी उन्हाळी पिकांना पाणी देतात. परंतु, पावसाळ्याच्या तोंडावर या विद्युत पंप व केबलच्या चोऱ्यांचे प्रमाण खेड तालुक्यात वाढले आहेत. रात्रीच्या वेळी विद्युत पंपाची चोरी होत आहे. केबलची नासधूस केली जात आहे.
विद्युत पंपांच्या चोरट्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कडूस, दोंदे, टोकेवाडी, पापळवाडी, आखरवाडी, कमान परिसरासह भीमा नदीच्या दोन्ही बाजूंच्या परिसरात चोऱ्या वाढल्या आहेत. तक्रार देऊनही पोलिस दखल घेत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
पापळवाडी येथील विमल ज्ञानेश्वर शिंदे यांची साडेसात अश्वशक्तीची मोटार सहा दिवसांपूर्वी चोरट्यांनी विहिरीवरून चोरली. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली, परंतु चोरट्यांचा तपास लागलाच नाही. तक्रार देऊन काहीच उपयोग होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कोरोनानंतर निसर्ग चक्रीवादळामुळे कोलमडलेल्या शेतकऱ्यांना आता विद्युत पंपांच्या चोरट्यांची चिंता सतावत आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पापळवाडीचे ज्ञानेश्वर शिंदे, कडूसचे विजय टोके, सचिन बनकर, देवराम नेहेरे, विकास ढमाले यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.