पिंपरी - शहरातील पवना नदीकाठ, रेल्वेमार्ग, एमआयडीसी, महापालिका आणि प्राधिकरणाच्या रिकाम्या जागांवर लोखंड, जुने फर्निचर, रद्दी, प्लॅस्टिक यांसारख्या भंगार मालाची अनधिकृत दुकाने, गोदामे फोफावली आहेत. ही संख्या सुमारे दोन हजारांवर गेली आहे. काही ठिकाणी जागा मालकांच्या मोकळ्या खासगी जागा भाड्याने घेऊन पत्र्याची गोदामे उभारून व्यवसाय केला जात आहे. मात्र, पुरेशा सुरक्षाविषयक दक्षता न घेतल्याने आगीसारख्या दुर्घटनांना आयते आमंत्रण मिळत आहे.
शहर परिसरात चिखली-कुदळवाडी हे भंगार मालाच्या दुकाने आणि गोदामांचे मोठे केंद्र असून, याच भागात दुकानांची संख्या जवळपास दीड हजारांच्या पुढे आहे. या संख्येत दररोज वाढच होत आहे. येथे शहरातील कागद, काच, पत्रा, प्लॅस्टिक, लोखंडाबरोबरच एमआयडीसीमधील नादुरुस्त यंत्र-सामग्री मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. रंगरंगोटी आणि दुरुस्ती केल्यावर यंत्रसामग्रीची फेरविक्री केली जाते. या दुकाने-गोदामांचे चालक आणि बहुतेक मजूर परप्रांतीय आहेत. ते गावाकडील लोक बोलावून त्यांच्यामार्फत भंगार मालाच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत आहेत. याच गोदामांमध्ये हे परप्रांतीय मजूर एकत्रित राहत असतात. या गोदामांमध्ये स्थानिक परिसरातील महिलाही मोठ्या प्रमाणावर काम करून उपजीविका करतात. दरवर्षी चिखली-कुदळवाडी येथे आगी लागण्याच्या दुर्घटना घडत असतात.
या भागापाठोपाठ चिंचवड, वाल्हेकरवाडी, आकुर्डी रेल्वे स्थानक रस्ता, भोसरी आदी ठिकाणीदेखील भंगार माल दुकानांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. पिंपळे गुरव येथील पवना नदीकाठचा भाग पत्राशेड उभारून भंगार मालाच्या अनेक दुकानांनी वेढला गेला आहे. स्मशानभूमी, सेंट थॉमस चर्च, नर्मदा गार्डन आणि हॉटेल महाराजाजवळील नदीपात्राच्या भागांतही या दुकानांमुळे सर्व परिसराला बकालपणा आला आहे. स्थानिक जागामालकांना जागेच्या क्षेत्रफळानुसार दरमहा सुमारे २५ हजार रुपयांपर्यंतचे भाडे दिले जात आहे. आकुर्डी रेल्वेस्थानक रस्त्यावर जुनी फर्निचर आणि इतर दुकाने थाटण्यात आली आहेत. गोदामांमध्ये कधी बेकायदा वीज जोड घेतला जातो; तर कधी गरजेनुसार जागामालकांच्या वीज मीटरमधून किंवा जवळपासच्या लोकांकडून वीजपुरवठा घेऊन दुकाने चालविली जातात.
चिंचवड येथील डॉ. हेडगेवार पुलाजवळही पत्राशेड उभारून प्लॅस्टिक कचरा जमा करण्यासाठी दुकाने थाटण्यात आली आहेत. जुनी सांगवी येथील मुळा नदीच्या किनारी पत्राशेड व भंगार मालाची दुकाने आहेत. जेथे जागा मालक असतील तेथे त्यांना जागेचे भाडे दिले जाते. मात्र, महापालिका, प्राधिकरण, एमआयडीसीच्या आरक्षित जागा किंवा मोकळे भूखंड, नदीकाठच्या जागांवर अनधिकृत दुकाने-गोदामांची जादा संख्या दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पुरेसा रस्ताच नसल्याने आगीचे बंब दुर्घटनेच्या ठिकाणीदेखील पोचणे अवघड होते.
मार्चएंडलाच आगीला मुहूर्त?
आर्थिक वर्षअखेरीस मार्चमध्ये लागणाऱ्या आगी या जाणीवपूर्वक घडविल्या जातात, असे निदर्शनास येत आहे. काही जण विम्याचा लाभ मिळविण्यासाठी या घटना घडवून आणत आहेत. यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता असते.
मात्र, नकळत लागलेल्या आगीसाठी संरक्षण कवच असणेही तितकेच गरजेचे आहे. आगीचा विमा हा इमारत व वस्तूंच्या संरक्षणासाठी गरजेचा आहे. व्यावसायिक व निवासी क्षेत्रासाठीही हा विमा अत्यावश्यक आहे. मात्र, याबाबतही नागरिकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे.
बीएस फोरमुळे...
सध्या बीएस फोरची वाहने मार्केटमधून हद्दपार करणे आवश्यक आहे. नव्याने पर्यावरणपूरक बीएस सिक्सची वाहने बाजारात दाखल होत आहेत. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या जुन्या वाहनांचा विम्याच्या माध्यमातून परतावाही चांगला मिळू शकतो, अशीही शक्कल लढविण्याचा व्यावसायिक प्रयत्न करीत आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
घरगुती आगीला निष्काळजीपणा, तर व्यावसायिक ठिकाणच्या आगीला अनधिकृत वीजजोड कारणीभूत आहे. पंख्यांची गती अधिक, गॅस शेगडीचे बटन व सिलिंडरचे रेग्युलेटर अर्धवट बंद, रात्रभर एसी विनाकारण सुरू, पाण्याच्या कूलरचे कनेक्शन तपासून न पाहणे, देवाजवळील निरंजन झोपण्यापूर्वी विझवणे, औद्योगिकदृष्ट्या उघड्या डीपी बंद ठेवणे, कचऱ्याचे ढिगारे वेळेत हलवणे, पानटपरी व हॉटेलच्या ठिकाणी रिकामी काडेपेटी टाकणे, पॉलिश पेपर, काडेपेटी तसेच फॉस्फरसयुक्त ज्वलनशील वस्तूंवर कडक निर्बंध असणे आवश्यक आहे.
- विकास पाटील, अध्यक्ष, पर्यावरण संवर्धन समिती
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.