सोमेश्वरनगर (पुणे) : पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथील पोल्ट्रीमुळे होणारे प्रदूषण 30 जूनपर्यंत शून्यावर आणण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे येथे बुधवारपासून सुरू असलेले आंदोलन ग्रामस्थांनी तात्पुरते स्थगित केले आहे. प्रशासनाने आंदोलक आणि कंपनीच्या प्रतिनिधींची चर्चा घडवून आणली.
कर्नलवाडी ग्रामपंचायतअंतर्गत झिरीपवस्ती येथे लाख ते सव्वा लाख कोंबड्याचे दहा पोल्ट्री शेड आहेत. पोल्ट्रीचालकाच्या दुर्लक्षामुळे कर्नलवाडी परिसरात दुर्गंधी सुटली होती. कोंबड्यांची विष्ठा, मृत कोंबड्या, बायोगॅसची स्लरी यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. तसेच, माशांमुळे डाळिंबासारखी पिकेही धोक्यात आली आहेत. वर्षभर ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सर्व विभागांशी, पोल्ट्रीचालकाशी पत्रव्यवहार केला. पण, प्रशासनाने डोळेझाक केली. अखेर उलट्यांचे आजार सुरू झाल्यावर ग्रामस्थांचा सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि बुधवारी एकत्र येत पोल्ट्रीकडे जाणारा रस्ता उकरला. पोलिसांच्या विनंतीवरून रस्ता बुजवण्यात आला. मग गेले दोन-तीन दिवस ग्रामस्थांनी पोल्ट्रीसमोर तंबू ठोकून गाड्या रोखण्याचे गांधीवादी धरणे आंदोलन सुरू केले. रोजगार बुडवून आळीपाळीने हजर राहत होते.
संबधित पोल्ट्री वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी संबंधित असल्याने आंदोलनावर दबाव आणण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. मात्र, ग्रामस्थ कणभरही बधले नाहीत. अखेर प्रशासनातील अधिकारी, पोल्ट्री कंपनीचे प्रतिनिधी यांच्याशी ग्रामस्थांची सकारात्मक चर्चा झाली. पोल्ट्री चालुद्या, पण प्रदूषण त्वरित शून्यावर आणा, अशी समजुतीची भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
पोल्ट्रीचालकांनीही वस्तुस्थिती मान्य करत दुरुस्तीचा शब्द दिला. सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, नायब तहसीलदार उत्तम बढे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत बागडे, तलाठी गणेश महाजन, सरपंच सुधीर निगडे, ग्रामपंचायत सदस्य, शरद सोसायटीचे अध्यक्ष अशोक निगडे, कंपनीच्या संचालक गीतांजली नाझीरकर उपस्थित होते.
सरपंच सुधीर निगडे म्हणाले, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी समजुतीची भूमिका घेत 30 जूनपर्यंत वेळ दिला आहे. जाणीवपूर्वक दुर्गंधी येत असलेल्या पोल्ट्रीसमोरच बसल्याने अधिकाऱ्यांना आमचे दुखणे समजले. आता कंपनीने प्रदूषण पूर्ण संपवावे अन्यथा पुन्हा ग्रामस्थ ऐकणार नाहीत. एक-दोन दिवसांत बैठकीतला निर्णय लेखी स्वरूपात घेणार आहोत.
नायब तहसीलदार उत्तम बढे म्हणाले, तहसीलदार यांच्या आदेशानुसार आम्ही घटनास्थळी पाहणी केली असता ग्रामस्थांच्या तक्रारीत तथ्य आढळले. ग्रामस्थांच्या भावना ऐकून घेतल्या. पोल्ट्री कंपनीने आठ- दहा दिवसांत दुरुस्ती करण्याचा शब्द दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.