पिंपरी - गरीब व गरजू व्यक्तींना सवलतीत अर्थात अवघ्या दहा रुपयांत शिवभोजन उपलब्ध करून देण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. त्यासाठी शहरातील चार ठिकाणांची निवड केली आहे. २६ जानेवारीपासून योजनेची सुरुवात होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार असून, दिवसाला पाचशे व्यक्तींना सवलतीत भोजन मिळणार आहे.
महापालिका स्तरावर शिवभोजन योजनेसाठी भोजनालयाची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षतेखाली समिती नियुक्त केलेली आहेत.
यात महापालिका आयुक्त सदस्य आणि जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी सदस्य सचिव आहेत. सक्षम खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, सुसज्ज भोजनालय, उपहारगृह या बाबींसह नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणांचा विचार करून शहरातील चार संस्थांची निवड समितीने केली आहे. शहरात योजना सुरू करण्याबाबत राज्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी नुकतीच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सरकारी अनुदान
नागरिकांना दहा रुपयांत भोजन मिळणार असले, तरी ते पुरविणाऱ्या संस्थेला राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे. एका थाळीचा दर पन्नास रुपये ठरविण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित संस्थांना प्रतिथाळी चाळीस रुपये अनुदान दिले जाईल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.