पुणे - प्रेमात पडल्यानंतर झालेल्या शरीर संबंधातून, ओळखीच्या किंवा अज्ञात व्यक्तीने केलेल्या बलात्कारामुळे ‘ती’ गर्भवती राहिली. लादलेलं हे मातृत्व काहींनी नाइलाजास्तव तर काहींनी बाळाची जबाबदारी घेत मोठ्या आव्हानानं स्वीकारली. मात्र तिच्यावर बेतलेल्या या प्रसंगामुळे कुटुंब आणि नातेवाइकांनी साथ सोडली. अचानक निराधार झालेल्या या दोन जिवांचा कोण सांभाळ करणार?, या चिंतेत असलेल्या अनेक कुमारी मातांना ‘आशाई’नं हक्काचं घर दिलं.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कुमारी मातांच्या आयुष्यातील समस्यांचा डोंगर कमी होऊन त्यांना निवारा मिळण्यासाठी ‘माहेर’ संस्थेने ‘आशाई’ प्रकल्प सुरू केला. संस्थेच्या वाघोली येथील पुनर्वसन केंद्रात सध्या सहा मुली वास्तव्यास आहे. याबाबत प्रकल्पप्रमुख वर्षा भुजबळ म्हणाल्या, ‘‘कुमारी मातांचं वय हे मुळात खूप कमी असतं. गर्भवती किंवा मूल झाल्यानं पुढील आयुष्य कसं जगायचं?, असा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. त्यामुळे कुमारी मातांना धीर देऊन त्यांचा सांभाळ करण्याचं काम या प्रकल्पातून सुरू आहे. एखादी गर्भवती किंवा बाळ झालेली मुलगी प्रकल्पात दाखल झाल्यानंतर तिला परिस्थिती समजावून सांगत मनोबल वाढविण्यात येतं.’’
काय करतेय आशाई संस्था...
संबंधित मुलाला जर ‘तिचा’ सांभाळ करायचा असेल तर त्याचं पालनपोषण कसं करावं, याबाबत मार्गदर्शन करतो. मात्र, तिला जर मुलाला सांभाळणं शक्य नसेल तर महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून त्याला दत्तक देण्यात येतं. चांगलं कुटुंब मिळालं तर या मुलींचं लग्नही लावून देतो. तसेच, काहींना त्यांच्या कुटुंबाने परत नेलं आहे. मात्र, ज्या मुलींचा कोणीच सांभाळ करायला तयार नाही किंवा तिला कोठे जाण्याची इच्छा नसेल तर तिचा संस्थेमार्फत सांभाळ केला जातो.
- वर्षा भुजबळ, प्रकल्प प्रमुख, ‘आशाई’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.