सोमेश्वरनगर : सोमेश्वरच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला. यामुळे 15 डिसेंबरपर्यंत ऊस तुटलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 30 डिसेंबरलाच प्रतिटन 2789 रूपयेप्रमाणे एकरकमी रक्कम वर्ग होणार आहे. असा निर्णय घेणारा 'सोमेश्वर' जिल्ह्यातील पहिला सहकारी कारखाना ठरला असून अन्य कारखान्यांवर 'एकरकमी एफआरपी'चा दबाव येणार आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वप्रथम भावाची कोंडी फोडत एफआरपीच्या ऐंशी टक्के रक्कम देण्याचा निर्णय डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात घेतला होता. शेतकऱ्यांना उसाची बिले अदा करण्याची वेळ आल्यावर मात्र, संचालक मंडळाने आज एकरकमी एफआरपी अदा करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना खूष केले आहे. सोमेश्वरची एफआरपी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 2789 रूपये आहे. 30 डिसेंबरपासून शेतकऱ्यांना याच भावाने रकमा दिल्या जाणार आहेत. याआधी केवळ दौंड शुगर या खासगी कारखान्याने एकरकमी एफआरपी दिली आहे. सोमेश्वरच्या निर्णयामुळे आता जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनाही स्पर्धात्मक दर द्यावा लागणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत. मात्र, यासाठी कारखान्यांना आर्थिक कसरत करावी लागणार आहे. सोमेश्वर कारखाना तुलनेने आर्थिक सक्षम आहे त्यामुळे स्वतःचा पुरेसा ऊस असतानाही कारखान्यांनी एकरकमी एफआरपीचा निर्णय घेतला आहे. खासगी कारखान्यांनाही आता ऊस उपलब्धता व्हावी म्हणून एकरकमी एफआऱपीचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी चिन्हे आहेत.
याबाबत सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप म्हणाले, अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकरकमी एफआरपीचा निर्णय घेतला आहे. सभादांचे एप्रिलअखेर उसाचे गाळप केले जाणार असून मागील हंगामाप्रमाणेच सर्वच बाबतीत अग्रेसर राहणार. तसेच अन्य कारखान्यांच्या तुलनेत अंतिम भावात कुठेही कमी पडणार नाही. अवकाळी पावसामुळे व हवामान बदलामुळे उसाला मोठ्या प्रमाणावर तुरे आले आहेत. परीणामी सभासदांचाच ऊस प्राधान्याने गाळप करण्याचे ठरले आहे. यासाठी सोमेश्वरने गेटकेन उसाचे गाळप पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने आजअखेर दोन लाख टन उसाचे गाळप केले असून 10.70 टक्के साखर उतारा राखत 2 लाख 8 हजारपेक्षा अधिक क्विटंल साखरेची निर्मीती केली आहे.
सोमेश्वरला पाच वर्षात पाच मुकुट
व्हीएसआयचा सर्वोत्कृष्ट चीफ केमीस्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवशंकर भोसले यांचा तसेच सर्वोत्कृष्ट डिस्टिलरीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डिस्टिलरी टीमचा सत्कार करण्यात आला. याआधीही कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, उर्जाबचत असे पुरस्कार मिळाले होते. विद्यमान संचालकांच्या कार्यकाळात पाच वर्षात पाच पुरस्कार मिळाले. याबद्दल सभासद, कामगार, अधिकारी व ऊसतोड वाहतूकदार-कामगार यांचेही आभार मानत आहोत, अशा भावना पुरूषोत्तम जगताप यांनी व्यक्त केल्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.