पुणे - ऍपद्वारे प्रवाशांना रिक्षा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील रिक्षा संघटनांनी पुढाकार घेतला खरा, परंतु राज्य सरकारकडून अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. "ओला', "उबर'ला तत्परतेने मान्यता देणारे रिक्षा संघटनांच्याबाबतीत भेदभाव का करते, असाही प्रश्न "रिक्षा पंचायत'कडून उपस्थित करण्यात आला आहे.
"ओला', "उबर' या सारख्या कंपन्यांचे शहरात गेल्या चार वर्षांत टप्प्याटप्प्याने आगमन झाले आहे. शहरात सुमारे 30 हजार कॅब आहेत. तर रिक्षांची संख्या सुमारे 70 हजारच्या आसपास आहे. लॉकडाउनच्या काळात मोबाईल क्रमांकाद्वारे ऍपबेस सेवा सुमारे चार महिने कार्यरत होती. त्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु, रिक्षा संघटनांतील मतभेदामुळे ही सेवा बंद पडली होती. रिक्षा पंचायतने सुमारे दोन वर्षांपूर्वीच "ऍपबेस' सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला सादर केला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या बाबत परिवहन आयुक्त कार्यालयाला कळविले आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.
तर, रिक्षा पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार म्हणाले, ""आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रवाशांना रिक्षा प्रवासाची सुविधा देणे शक्य आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवानगी द्यायची गरज आहे. तसेच त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले तर, शहरातील रिक्षाचालकांनाही आधार मिळेल आणि प्रवाशांनाही चांगल्या पद्धतीची सेवा मिळेल.'' शहरात सुमारे 850 रिक्षा स्टॅंड आहेत. ऍप बेससेवेमुळे त्या-त्या भागातील रिक्षाचालकांना हमखास रोजगार मिळू शकतो आणि प्रवाशांनाही तत्परतेने किफायतशीर दरात सेवा उपलब्ध होईल. कोरोनाच्या काळात सुरक्षित प्रवास सेवेची गरज अधोरेखित झाली आहे. त्यामुळे या बाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रवासी म्हणतात......
अजित थोरवे - रिक्षात बसताना मीटरची धास्ती वाटते. काही रिक्षांमध्ये ते वेगाने फिरते. प्रवास करण्यापूर्वीच किती भाडे आकारले जाणार आहे, हे समजल्यास मीटरची धास्ती वाटणार नाही आणि प्रवासही चांगल्या पद्धतीने होईल.
सुनंदा जाधव - गर्दीच्या वेळेत किंवा पाऊस सुरू झाल्यावर रिक्षा मिळत नाही. जवळचे भाडे ते नाकारतात. ऍपबेस रिक्षा सुरू झाल्यास या प्रकारांना पायबंद बसेल आणि गरजेच्या वेळी रिक्षा मिळेल.
कैवल्य जोशी - विशेषतः भाडे आकारणीच्या तक्रारींमुळेच रिक्षाचे प्रवासी कॅबकडे वळाले आहेत. त्यांनाही खात्रीशीर आणि भरवशाची सुविधा मिळाली तर, रिक्षाचा वापर पुन्हा वाढेल.
अनुसूय बिऱ्हाडे - रिक्षा शोधायला रस्त्यावर जाण्याची वेळ येणार नाही, अशी व्यवस्था ऍप पद्धतीमुळ होऊ शकेल. काही वेळा रिक्षा शोधण्याच खूप वेळ जातो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.