विलास काटे
आळंदी, ता. २४ : राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आणि १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी आळंदी नगर परिषद गणली जाते. १० प्रभागांमधून २१ नगरसेवक आणि नगराध्यक्ष असे २२ सदस्य निवडून जाणार आहेत. मागील १५ वर्षांमध्ये राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विकास झाला. विकास होऊनही प्रश्न तेच. सामाजिक प्रश्नापेक्षा गावकी भावकी आणि पैसा या मुद्द्यांवरच स्पर्धा आहे. नगराध्यक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांच्यामध्ये चुरस असून दोन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. तर २१ सदस्यपदासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काही जागांवर शिवसेना लढत आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता तर राष्ट्रवादीचा एकही उमेदवार रिंगणामध्ये नव्हता. भाजपचे नगराध्यक्ष अवघ्या ३७ मतांनी निवडून आल्या. यंदा मात्र राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी खुली लढत होत असून शिवसेना मात्र उमेदवार देऊ शकली नाही. सदस्यपदासाठी भाजपने नगरसेवकाच्या सर्वच्या सर्व २१ जागांवर उमेदवार दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग एक आणि प्रभाग सातमध्ये उमेदवार दिलेला नाही आणि प्रभाग दोन व प्रभाग आठमध्ये प्रत्येकी एक तर उर्वरित प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन उमेदवार असे १४ उमेदवार उभे केले आहेत.
जमेची बाजू असूनही उमेदवार शोधताना दमछाक
शिवसेनेने १० उमेदवार उभे केले असून प्रभाग तीन प्रभाग पाच प्रभाग सहा आणि प्रभाग आठमध्ये एकही उमेदवार उभा करता आला नाही. मागील वर्षभरात आढावा घेतला तर शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी आळंदीमध्ये विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने हजेरी लावली. भरघोस निधीही दिला. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पक्षाची बांधणी केली. याचा फायदा स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना घेता आला नाही. परिणामी नगराध्यक्षपदाचा उमेदवार मिळाला नाही. अनेक प्रभागात उमेदवारी मिळण्यास अडचण झाली. या उलट भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होती. मात्र, गावकी आणि भावकीच्या नादामध्ये अनेक चांगले उमेदवार राष्ट्रवादीच्या गळाला लागले. यामुळे राष्ट्रवादीला चांगले उमेदवार देता आले. आता खरी लढत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्येच आहे.
पदाधिकाऱ्यांच्या कोलांट्या उड्या
पक्षीय स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कोलांट्या उड्या यावेळी आळंदीकरांनी अनुभवल्या. ऐन वेळेला उमेदवारीसाठी अन्य पक्षात उडी मारण्याचे दिसून आले. यामुळे या पदाधिकाऱ्यांवर पक्ष कारवाई करेल का याकडे लक्ष लागले आहे. भाजपच्या वतीने आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीकडून माजी आमदार दिलीप मोहिते, शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे स्वतः निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत.
समस्यांऐवजी भावकीवर निवडणूक
आळंदी शहराचे सर्वात प्रमुख पाणी समस्या असून दोन अडीच तीन दिवसांनी पाणी येते. सरकारने सर्व प्रकारच्या सुविधा, भामा आसखेडचे पाणी दिले. वर्षाला दोन ते तीन कोटी रुपये शुद्धीकरणासाठी खर्च होतो. मात्र, उमेदवारांनी स्वतःच्या परिचय व्यतिरिक्त पाणी आणि इंद्रायणी प्रदूषणाचा मुद्दा हाताळला नसल्याचे चित्र आहे. केवळ पैसा आणि नात्यागोत्यांवर भर देत मतदारांपर्यंत उमेदवार जात आहे.
खरा कस भाजपचा लागणार
राज्यात भाजपची सत्ता असल्याने आणि आळंदी शहरामध्ये भाजपचे संघटन गेल्या १० वर्षांत मजबूत झाले. मात्र, तिकीट वाटपात दुखावलेले कार्यकर्ते अन्य पक्षाकडून उभे राहिले. यामुळे भाजपची काही प्रभागांमध्ये गोची झाली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे स्टार प्रचारक स्थानिक पातळीवर नसल्याचे चित्र आहे.
मागील वेळेचे पक्षीय बलाबल
(२०१७)
प्रभाग : ९
सदस्य संख्या : १८
भाजप : १०
शिवसेना संयुक्त : ६
शिवसेना पुरस्कृत : २
नगराध्यक्ष : भाजप (एससी)
स्थानिक प्रमुख प्रश्न
पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, वीज
अतिक्रमण, वाहतूक कोडी आणि अवैध बांधकामे
भाजी मंडई, पार्किंग
सिद्ध बेट विकास
प्रचारातील प्रमुख मुद्दे
इंद्रायणी संवर्धन
दैनंदिन पाणीपुरवठा
खेळासाठी मैदान, भाजी मंडई, घाट सुशोभीकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.