चाकण, ता. ८ : ओढे खुशाल बुजवा , त्याच्यावर मुरूम, माती, दगड राडारोडा टाका, आणि चक्क बांधकामही करा असा शिरस्ता चाकण मध्ये सुरू आहे. शंभर फूट रुंदीचे ओढे अगदी पाच ते दहा फुटाचे नाली सारखे झाले आहे अशी भयानक अवस्था चाकणमध्ये आहे. हे ओढे बड्या धेंडांनी काही लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी पूर्णपणे गायब केले आहेत. प्रशासन मात्र डोळे झाकून आहे. त्यामुळे पावसाळ्यात काही ठिकाणी पुराचे पाणी रहिवासी वस्तीत, दुकानात शिरते रस्त्यावर येते त्यामुळे पुढील काळात हा मोठा धोका आहे.
चाकण औद्योगिक परिसर झपाट्याने विकसित होत असताना नैसर्गिक जलस्रोत मात्र नामशेष होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. चाकण व परिसरातील अनेक नैसर्गिक ओढे बड्या धेंडांनी , काही बांधकाम व्यावसायिकांनी बेकायदेशीररीत्या बुजवून तसेच ओढ्याचे मार्ग बदलून गायब केले आहेत असा स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे.या प्रकारामुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल धोक्यात आला आहे . पुढील काळात भीषण पूरस्थिती आणि पाणीटंचाईचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार पूर्वी चाकण परिसरात लहान-मोठे अनेक ओढे वाहत होते. पावसाळ्यात हे ओढे अतिरिक्त पाण्याचा निचरा करत असल्याने पूरस्थिती टळत असे. मात्र गेल्या काही वर्षांत औद्योगिक प्रकल्प, गोदामे, गृहप्रकल्प ,खासगी मालमत्तांसाठी तसेच बांधकाम व्यावसायिकांनी या ओढ्यांवर सर्रास अतिक्रमण केले आहे. काही ठिकाणी ओढ्यांचे पात्र बुजविण्यात आले तर काही ठिकाणी त्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आला आहे.विशेष म्हणजे हे प्रकार खुलेआम होत आहेत. पुणे नाशिक महामार्गावर, चाकण आंबेठाण, चाकण शिक्रापूर, चाकण तळेगाव मार्गावर महत्त्वाचे मोठे ओढे काही बांधकाम व्यावसायिकांनी बुजवलेले आहेत. ओढे बुजविणाऱ्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
नियमांना बगल
नियमांनुसार कोणत्याही नैसर्गिक जलप्रवाहात बदल करण्यासाठी पर्यावरण विभागाची , जलसंपदा विभागाची परवानगी आवश्यक असते; मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता कामे झाल्याचे निदर्शनास येत आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते...
ओढे बुजविल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी थेट वसाहतींमध्ये शिरते. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते, कारखाने आणि घरांमध्ये, रहिवासी वस्तीत पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच भूजल पातळी खालावत चालली असून विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडण्याची समस्या निर्माण होत आहे.ओढ्यांचे मूळ स्वरूप पुनर्संचयित करावे, अतिक्रमणे हटवावीत पुढील काळात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस धोरण आखावे, अशी मागणी जोर धरत आहे.
यापूर्वी ओढ्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. संबंधित विभागाने ती अतिक्रमणे काढली पाहिजेत. नगर परिषदेच्या हद्दीत मोठ्या ओढ्यावर जी अतिक्रमणे आहेत ती अतिक्रमणे काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुढील काळात ओढ्यावर अतिक्रमण होणार नाही यासाठी नगर परिषद काळजी घेत आहे.
- डॉ.अंकुश जाधव, मुख्याधिकारी, चाकण नगर परिषद
0143
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.