पळसदेव, ता. १८ : इंदापूर तालुक्यात मे २०२५ मध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील सुमारे आठ हजार ५०० शेतकऱ्यांच्या २४७१.७६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे व जमिनीचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून सुमारे पाच कोटी ५७ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांना आहे. मात्र, वेळेत भरपाई न मिळाल्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचा फार्स कशासाठी? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
अवकाळी व अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे होणारे नुकसान शेतकऱ्यांचे वर्षाचे अर्थकारण पाण्यात घालवणारे असते. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून केवळ त्याचे पंचनामे करण्याइतपत शासकीय यंत्रणा राबते. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे यंत्रणा करीत आहे. ही बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.
कृषी विभाग व तहसील कार्यालयाच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केले. मग आता चार महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी शेतकऱ्यांना एक दमडीही मिळाली नसल्याची वस्तुस्थिती आहे. यातच आता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीपातील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
चार हजारांहून अधिक घरांचे नुकसान
मे २०२५ महिन्यामध्ये अवकाळीने तालुक्यातील ३ हजार ६३९ घराचे प्रापंचिक नुकसान झाले. यापैकी प्रतिलाभार्थी १० हजारांची मदत दोन हजार ९६४ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांची कागदपत्राची पूर्तता व त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. तर नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आजपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सुमारे ४२५ घरे पावसाच्या पाण्याने बाधित झाली आहेत. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे काम अद्यापही सुरू असून सर्वाधिक सणसर गावातील घरांचे नुकसान झाले असल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.
सध्या शेतकऱ्यांना वाली उरला नाही. निवडणुकीत निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ-मोठी आश्वासने देण्यापलीकडे नेते काहीच काम करत नाहीत. सत्तेत आल्यावर याच नेत्यांना शेतकऱ्यांचा विसर पडतो. कृषी कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे केवळ गाजर दाखविण्यात आले आहे.
-विजय गावडे, अध्यक्ष, बळीराजा प्रतिष्ठान
शेतकऱ्यांप्रती सरकार असंवेदनशील
खते, औषधे, पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या तुलनेत शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. रक्ताचं पाणी करून पिकविलेल्या मालाचे चार पैसे मिळतील या आशेने पिकांची लेकरासारखी निगा राखतो. मात्र निसर्गाच्या वक्रदृष्टीपुढे त्याला नमते घ्यावे लागते. अशा वेळी मायबाप सरकारने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची त्याची अपेक्षा असते. मात्र सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील आहे. दिवाळीच्या तोंडावर खरिपातील पिकांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांची दिवाळी कडू ठरविणारे आहे. यामुळे शासनाने पंचनामे करण्याबरोबर त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. दरम्यान, तालुक्यात कृषीमंत्री पद असल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत असे शेतकऱ्यांतर्फे असल्याचे विजय गावडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.