काटेवाडी, ता. ७ : काटेवाडी (ता. बारामती) गावाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन महाराष्ट्रातील पहिले ‘स्मार्ट इंटिलिजेंट व्हिलेज’ म्हणून विकसित करण्याचा अभिनव उपक्रम सुरू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट व्हिलेज योजनेचा भाग असलेल्या या उपक्रमात शेती, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार आहे.
महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात १० स्मार्ट व्हिलेज विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३५०० हून अधिक गावांना लाभ मिळेल. काटेवाडी हे बारामती तालुक्यातील पहिले स्मार्ट व्हिलेज ठरणार आहे. व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायझेस आणि २४ भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे. हाय-स्पीड इंटरनेट, स्मार्ट डिव्हायसेस आणि डेटा ॲनालिटिक्सच्या माध्यमातून गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुकर होईल. याशिवाय, सौरऊर्जा आणि पर्जन्य जलसाठवण यासारख्या पर्यावरणपूरक उपाययोजनांवरही भर दिला जाईल. या योजनेला केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी मिशनशी जोडण्यात आले आहे.
काटेवाडीतील यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्यातील इतर गावांसाठी हा प्रकल्प आदर्श ठरेल. तसेच, गावातील महिलांना डिजिटल साक्षरता आणि ऑनलाइन व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. ही योजना जिल्हा प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहकार्याने राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी, तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
शेतीत तंत्रज्ञानाची क्रांती
शेतकऱ्यांसाठी स्मार्ट सेन्सर्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर होईल. यामुळे हवामान, मातीची गुणवत्ता आणि पिकांच्या वाढीची माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मिळेल. शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर आणि पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सल्ला उपलब्ध होईल. यामुळे उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तसेच, शेतमालाला थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले जाणार आहेत.
आरोग्य आणि शिक्षणात सुधारणा
आरोग्य सेवांसाठी टेलिमेडिसीन सुविधा उपलब्ध होईल. ज्यामुळे गावकरी मोबाईल ॲपद्वारे डॉक्टरांशी संपर्क साधू शकतील. याशिवाय, गावात डिजिटल हेल्थ सेंटर्स उभारली जातील. जिथे नियमित तपासण्या आणि औषधांचा पुरवठा होईल. शिक्षण क्षेत्रात ऑनलाइन क्लासरूम आणि डिजिटल लायब्ररी स्थापन केल्या जातील. यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल आणि शिक्षकांना नवीन तंत्रज्ञानावर प्रशिक्षण दिले जाईल. विशेषतः मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर केला जाईल.
पायाभूत सुविधा
गावातील पाणीपुरवठा, वीज वितरण आणि कचरा व्यवस्थापनासाठी आयओटी तंत्रज्ञानाचा वापर होईल. स्मार्ट मीटर्समुळे वीज आणि पाण्याचा अपव्यय टाळला जाईल. कचरा विल्हेवाटीसाठी स्वयंचलित यंत्रणा आणि पुनर्चक्रण प्रकल्प उभारले जातील.
तंत्रज्ञानाबाबत ग्रामस्थांमध्ये आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही प्रमुख आव्हाने आहेत. यासाठी शासनाने ग्रामस्थांसाठी विशेष प्रशिक्षण सत्रे आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तंत्रज्ञान बदलत असताना त्या स्पर्धेमध्ये ग्रामीण भाग सुद्धा तेवढाच अपडेट असावा, यासाठी भविष्यातील अनेक संधींचा विचार करून ही योजना राबविण्यात येत आहे.
- किशोर माने, गटविकास अधिकारी, बारामती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.