नारायणगाव, ता. २५ : जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी जिल्हा बँकेच्या वतीने सहकारी सोसायटीमार्फत सुमारे ३६ कोटी रुपयांचे पीक कर्ज व दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले आहे. अतिवृष्टीमुळे या हंगामात तालुक्यातील सुमारे ८० टक्के द्राक्ष बागांना घड निर्मिती झाली नाही. हंगामही वाया गेला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिक विवंचनेत आहेत.
द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने दीर्घ मुदतीच्या कर्जावरील व्याज माफ करावे. पीक कर्ज मार्च अखेर वसूल न करता एक वर्षाची मुदत वाढ मिळावी. नवीन द्राक्ष बागा उभारणीसाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
जुन्नर तालुक्यात सुमारे तीन हजार एकर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. जम्बो जातीच्या द्राक्ष निर्यातीत पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुका अग्रेसर समजला जातो. अन्य फळबागांच्या तुलनेत द्राक्ष पीक खर्चिक पीक आहे. द्राक्ष पीक वार्षिक असल्याने वर्षभर बागेच्या संगोपनासाठी खर्च करावा लागतो. घड निर्मिती पूर्वी दोन लाख व घडनिर्मिती झाल्यानंतर पुढील चार महिन्यात दोन लाख असा एकरी चार लाख रुपये द्राक्ष बागेला खर्च येतो. नवीन द्राक्ष बाग उभारणीसाठी सुमारे नऊ लाख रुपये खर्च येतो. द्राक्ष निर्यातीतून पैसे मिळवून देणारे हे पीक हवामान बदलामुळे मागील काही वर्षात अडचणीत सापडले आहेत.
राज्यातील दोन द्राक्ष उत्पादकांनी नुकत्याच आत्महत्या केल्या आहेत. द्राक्ष बागा वाचवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने द्राक्ष उत्पादकांना पॅकेज जाहीर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर किमान जुन्या व दीर्घ मुदतीच्या कर्जावरील व्याज माफ करणे, कर्ज वसुली तूर्त थांबवणे आवश्यक आहे. अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक संदीप वारुळे, द्राक्ष उत्पादक गुलाबराव नेहरकर, हरिभाऊ वायकर, राजाराम पाटे,राहुल बनकर, संजय कानडे, अवधूत बारवे, रोहन पाटे, अमोल पाटे, सचिन तोडकरी, गणेश मेहत्रे, विकास दरेकर, राजेंद्र वाजगे, दीपक वायकर या शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी बाळासाहेब मुरादे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील ७५ सोसायटीमार्फत एक हजार ४११ शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून दिलेले आहे.
उत्पादकांकडून कोट्यवधींची गुंतवणूक
- द्राक्ष बागांची उभारणी
- फवारणीसाठी ट्रॅक्टर
- मशागतीसाठी अवजारे
- प्लॅस्टिक ट्रे, पॅक हाऊस
दृष्टिक्षेपातील कर्जाची स्थिती
- जिल्हा मध्यवर्ती बँकेसह पतसंस्था व विविध राष्ट्रीयकृत बँकेकडून शेतकऱ्यांनी घेतले कर्ज
- घेतलेल्या कर्जाचा आकडा १०० कोटी रुपयांच्या पुढे
- जिल्हा बँकेच्या वतीने सहकारी सोसायटी मार्फत सुमारे ३६ कोटी रुपयांचे पीक कर्ज व दीर्घ मुदतीचे कर्ज
- दीर्घ मुदतीच्या कर्जावर आकारले जाते साडेबारा टक्के व्याज
- तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर व्याज आकारले जात नाही.
द्राक्ष पिकासाठीचे कर्ज................ ३२ कोटी २८ लाख रुपये
दीर्घ मुदतीचे कर्ज................३ कोटी ८४ लाख रुपये
खरीप पिकांसाठी पीक कर्ज वाटप...........२६३ कोटी १९ लाख रुपये.
रब्बी पिकासाठी पीक कर्ज वाटप............ ७८ कोटी रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.