रांजणगाव सांडस, ता. २७ : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या कामात उरळगाव (ता. शिरूर) परिसरातील कामात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे ही साडेसात कोटींची योजना पाण्यात जाते की काय? ही पाणीपुरवठा योजना नेमकी कोणासाठी? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ग्रामपंचायतीने केलेल्या निवेदनामध्ये कामाचे अंदाजपत्रक तांत्रिक मान्यता आदेश, प्रशासकीय मान्यता आदेश आदी कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे प्राप्त नाहीत. पाणीपुरवठा योजनेत वापरलेले पाइप अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून पाइपलाइन देखील योग्य खोल घेतली गेली नाही. तसेच पाइपलाइन संपूर्ण गावामध्ये फिरली गेली नाही तसेच पाइपलाइनसाठी घेतलेले खड्डे जागोजागी तसेच आहेत. खड्डे अनेक ठिकाणी दुरुस्त केले गेले नाही. पाइपलाइनचे काम सप्टेंबर २०२३ पासून सुरू असून अद्यापही काम पूर्ण झाले नाही. गावातील अनेक वाड्यावस्तीवरती पाइपलाइन पोहोचवली नसल्याने ‘हर घर जल’ अपूर्णच राहत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावठाणातील अनेक कॉंक्रिटीकरणाचे रस्ते फोडले असून अनेक वेळा ठेकेदाराला सांगूनही ते दुरुस्त केले गेले नाही. सकाळच्या प्रतिनिधीने कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
उरळगावमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण व दर्जाहीन झाले आहे. या संदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल.
- उद्धव जाधव, ग्रामसेवक उरळगाव (ता. शिरूर)
सरपंचांना विश्वासात न घेता संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या सहमतीने सर्व कामे झाले आहेत. गावामध्ये पाइपलाइन टाकताना ठिकठिकाणी रस्त्याची खोदाई करण्यात आली असून त्यामुळे रस्त्याचे दुर्दशा झाली आहे. त्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. गावठाणामध्ये व सर्व वाड्यावर पाइपलाइन फिरून सर्वांना पाणी मिळणे गरजेचे आहे. ही योजना दर्जाहीन व अपूर्ण असल्याने हस्तांतरित करून घेण्यास ग्रामपंचायत कार्यालयाचा विरोध आहे.
- स्वप्नील गिरमकर, सरपंच उरळगाव (ता. शिरूर)
कडक कारवाईची मागणी
ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश असताना काही ठेकेदार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे योजना जनतेच्या फायद्याऐवजी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. या योजनेतील त्रुटी तत्काळ दुरुस्त करणे आणि दोषींवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. प्रशासनाने कामाची पाहणी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.
प्रशासनाविषयी तीव्र संताप
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी पुणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन कामाच्या दर्जाचे तपासणी करण्याची लेखी मागणी केली आहे. कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरपंच स्वप्नील गिरमकर, उपसरपंच लंकाताई सचिन पांचुदकर, सदस्य स्वाती शशिकांत कोकडे आदी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी या योजनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी प्रशासनाविषयी तीव्र संताप व नाराजी व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.