जयराम सुपेकर : सकाळ वृत्तसेवा
सुपे, ता. २७ : बारामती तालुक्यातील सुपे व परिसरातील गावातून ८५ पेक्षा अधिक शेत रस्त्यांचा प्रश्न सहमतीने मार्गी लागला आहे. यामुळे सुमारे आठ हजार शेतकऱ्यांना रस्त्याचा फायदा होणार आहे. रस्त्यासाठी आणखी शेतकरी स्वतःहून पुढे येत आहेत. त्यामुळे सुपे मंडलातील रस्त्यांची संख्या आणखी वाढण्याचा अंदाज प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे यांनी व्यक्त केला. मोठ्या प्रमाणावर रस्ते होऊन, वाद मिटण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरावा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानामुळे अनेक गावांच्या वाड्या-वस्त्यांचा शेत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मदिवस व महात्मा गांधी जयंती या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा होत आहे. या अभियानांतर्गत रस्त्यांविषयी शेतकऱ्यांच्या सहमतीने निर्णय घेण्याची कामे चालू आहेत. यांतर्गत सुपे मंडलातील १२ गावातील आतापर्यंत सुमारे ८५ पेक्षा अधिक रस्त्यांची कामे मार्गी लागल्याची माहिती मंडलाधिकारी हंसध्वज मनाळे यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी सुपे महसूल मंडल कार्यालयाला नुकतीच भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. सुपे मंडलांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामाबाबत कौतुक केले. शेत रस्त्यांचे रखडलेले प्रश्न मार्गी लागून शेतकरी व ग्रामस्थांना रस्त्याचा उपयोग होणार आहे. पुढे या रस्त्यांवर सरकारचा निधी पडून चांगले रस्ते होतील, अशी अपेक्षा या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, रस्त्यांच्या कामांसाठी सुपे सजातील ग्राम महसूल अधिकारी नीलेश गद्रे, राहुल केंद्रे, आशुतोष पाटील, नीलम देशमुख, अनिता धापटे आदींसह त्या त्या गावांचे सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, कोतवाल आणि शेतकरी यांचे सहकार्य लाभत आहे.
१. नवीन रस्त्यांची गरज आहे. अशा ठिकाणी बांधावर जाऊन, प्रत्यक्ष भेट
२. दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांशी समन्वय साधून, चर्चा करून सहमतीने सोडवले प्रश्न
३. रस्ते निश्चित करून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची घेतली जाते सहमती
४. रस्त्याचा नकाशा तयार केला जातो. कलम १४३ नुसार नवीन रस्ता आदेश देण्याचे कामकाज सुरू
५. आदेशाची नोंद अभिलेखावर होणार आहे. रस्ता होत असल्याने शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद
सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणच्या जुन्या रस्त्यांचा वाद कायम स्वरूपी मिटणार आहेत. विशेषतः शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. रस्ता झाल्यामुळे जमिनीची किंमत वाढणार आहे. दळण-वळणाचा प्रश्न सुटल्यामुळे समाधान मिळणार आहे. शेतीमालाची ने-आण करणे सोपे होणार आहे.
- वैभव नावडकर, प्रांताधिकारी
रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने, शेतकरी स्वतःहून पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे आमच्याही रस्त्याचा प्रश्न मिटवा, अशी शेतकऱ्यांची मागणी वाढत आहे. रस्त्यासाठी एका बांधावर गेलो. दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले आणि त्यांचा सोळा वर्षांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. त्यावर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया ऐकून माझेही मन भरून आले.
- हंसध्वज मनाळे, मंडलाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.