मनरेगा संपविण्याचे भाजपचे कारस्थान
विरोधकांचा हल्लाबोल; संघावरही जोरदार टीका
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १५ ः- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यात बदलासाठी सरकारने आणलेल्या विकसित भारत जी राम जी विधेयक २०२५’ वरून विरोधी पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे केवळ नाव बदलण्याचे नव्हे तर ‘मनरेगा’ संपविण्याचे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कारस्थान असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षांनी केला आहे.
लोकसभेत आज हे विधेयक मांडण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र लोकसभेच्या कामकाज विषयक समितीच्या बैठकीत या विधेयकावरून जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेत हे विधेयक राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणारे असल्याचा आरोप केला. अखेरीस विधेयकाच्या व्यापक फेरपडताळणीच्या सरकारच्या आश्वासनानंतर गोंधळ शांत झाला. आता उद्या (ता. १६) लोकसभेत ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान हे विधेयक मांडतील.
दरम्यान, मनरेगामध्ये बदलाच्या प्रस्तावित विधेयका विरोधी पक्षांनी सरकारवर सडकून टीका केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘एक्स’वरून टीका करताना म्हटले, की हा केवळ ‘मनरेगा’ नाव बदलण्याचा मुद्दा नसून भाजप, रा. स्व. संघाकडून ‘मनरेगा’ संपवण्याचे हे कारस्थान आहे. संघाच्या शताब्दी वर्षांच्या निमित्ताने गांधीजींचे नाव पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. गरीब, मजुरांविरुद्धच्या प्रत्येक तरतुदीविरुद्ध काँग्रेस पक्ष संसदेत आणि रस्त्यावर जोरदार विरोध करेल. वरिष्ठ तृणमूल काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी मनरेगाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावित निर्णयाला ‘महात्मा गांधींचा अपमान’ असे संबोधले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.