पुणे, ता. ३ : ‘‘यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व जेव्हा परदेशात जायचे, तेव्हा त्यांना तेथे काय अनुभव आला, काय वाटले हे ते पत्नीला पत्र लिहून कळवत असत. प्रत्येक माणसाच्या मनात भावनांचा कल्लोळ असतो, पण तो मोबाईलच्या जमान्यात व्यक्त होतोच असे नाही. आजची कुटुंबव्यवस्थेची वीण विस्कटत चालली आहे. कारण पत्रांची जागा यंत्राने घेतली आहे. नात्यांमधील कृत्रिमता घालवण्यासाठी पत्रे लिहिण्याचा प्रकार सुरू व्हायला हवा,’ असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केले.
दिलीपराज प्रकाशनच्या ५४व्या वर्धापन दिनानिमित्त दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार प्रदान सोहळा आणि राजीव बर्वे लिखित ‘मनातील पत्रे’ या तीन हजाराव्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी पवार बोलत होते.
एस. एम. जोशी सभागृहात शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रमुख अतिथी व ‘सकाळ’चे विशेष लेखन संपादक प्रवीण टोकेकर, ज्येष्ठ समीक्षक संजय भास्कर जोशी, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे, संचालक मधुर बर्वे हे व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी नागपूर येथील अनिल बुक एजन्सीचे संचालक अनिल टांकसाळे यांचा सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्काराने गौरव करण्यात आला.
टांकसाळे म्हणाले, ‘‘मी गेले ५५ वर्ष अव्याहतपणे पुस्तक वितरण व्यवसायात आहे. मराठी वाचकांना काय हवे आहे हे जाणून घ्यायचे होते, त्यासाठी पुस्तक विक्रीच्या व्यवसायात पाऊल ठेवले. मी हा व्यवसाय नसून एक चळवळ म्हणून त्याकडे पाहत आहे.’’
टोकेकर यांनी दिलीपराज प्रकाशन हे मराठी भाषेला सकस करणारी संस्था असल्याचे नमूद करत येत्या काळात तंत्रज्ञानामुळे पुस्तकांची रूपे बदलतील, तंत्र बदलेल पण शब्द हे महत्त्वाचे साधन कायमच राहील, असे सांगितले. लेखक राजीव बर्वे यांनी पत्रलेखन हे आपल्या भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे साधन आहे, असे मनोगत व्यक्त केले.
संजय जोशी म्हणाले की, अलीकडे म्हणतात की वाचन कमी झाले आहे, पण हे खरे नाही. वाचक कमी नसून, आपण विविध विषय घेऊन त्यांच्यापर्यंत जायला हवे. मधुर बर्वे यांनी प्रास्ताविक करताना दिलीपराज प्रकाशन संस्थेचा हा प्रवास मांडला.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.