पुणे, ता. ५ : ‘‘शरीर गेल्यावरही जे आपल्यातून जात नाही आणि परब्रह्मापासून जे दूर नाही, ते म्हणजे अमृत. मृत्यूकडून अमृताकडे जाण्यासाठी गुरुकृपा आवश्यक आहेच. पण ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘अमृतानुभव’ हे ग्रंथ व्यवस्थित वाचल्यानंतर अमृताकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो,’’ असे प्रतिपादन आध्यात्मिक योगगुरू श्री एम यांनी केले.
जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारा स्वास्थ्यजागर अर्थात ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ या महोत्सवाला शुक्रवारपासून सुरवात झाली. संतसाहित्यातील ज्ञानामृत रसाळ पद्धतीने उलगडणाऱ्या ‘अमृतानुभव’ या कार्यक्रमाने महोत्सवाची नांदी झाली. श्री एम यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, संचालिका मृणाल पवार उपस्थित होते.
श्री एम म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्वर हे संत परंपरेतील सर्वश्रेष्ठ संत. त्यांनी रचलेली ‘ज्ञानेश्वरी’ हे भगवद्गीतेवरचे सर्वोत्तम भाष्य आहे. गीतेतील प्रत्येक श्लोकावर संत ज्ञानेश्वरांनी सविस्तर विवेचन केले आहे. ज्ञानेश्वरीचे दुसरे नाव म्हणजे ‘भावार्थदीपिका’. भगवद्गीतेचा खरा अर्थ उजळवणारा ग्रंथ, असा त्याचा अर्थ आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली. अशी समाधी घेता येणारे साधू-संत फार थोडे असतात. समाधी अवस्था अजिबात सोपी बाब नाही. मी माझ्या आयुष्यात समाधी घेतलेली एकच व्यक्ती पाहिली; ती म्हणजे माझे गुरू महेश्वरी नाथ बाबा. ते देखील नाथ संप्रदायातील होते. ज्येष्ठ बंधू संत निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्वरांचे गुरू होते. संत निवृत्तीनाथांनी संत ज्ञानेश्वरांना ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथानंतर ‘अमृतानुभव’ या ग्रंथांची रचना करण्यास सांगितले. या ग्रंथात संत ज्ञानेश्वरांनी त्यांचा ‘अमृता’समान आध्यात्मिक अनुभव शब्दबद्ध केला आहे, म्हणून याचे नाव अमृतानुभव.’’
‘‘आजच्या या कार्यक्रमात शब्दातून अमृतानुभव घेता येणार आहे. जो आनंद आपण बाहेर शोधत आहोत, तो आनंद या कार्यक्रमात संतवचनांच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. प्रत्येक योगी जिथवर पोचू शकतो, त्या मार्गावर आपण संगीताच्या माध्यमातून जाऊ शकतो. याला शब्दयोग म्हणतात. हा शब्दयोग आज बालगंधर्व रंगमंदिरात अनुभवता येणार आहे.’’ असे ते म्हणाले.
‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ या महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. या महोत्सवासाठी ‘सुहाना मसाले’ हे मुख्य प्रायोजक आहेत. विश्वकर्मा विद्यापीठ हे सहप्रायोजक असून, भारती विद्यापीठ हे सहयोगी प्रायोजक आहेत. महोत्सवांतर्गत शनिवारी (ता. ६) सायंकाळी सात वाजता कोथरूडच्या सूर्यकांत काकडे फार्म येथे प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांची मैफील होणार आहे. तसेच, रविवारी (ता. ७) दिवसभर हॉटेल कॉनरॉड येथे नामवंत वक्त्यांची मार्गदर्शन सत्रे होणार आहेत.
----
‘अमृतानुभव ही विलक्षण अनुभूती
‘‘अमृत या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे परमानंद. आपण नेहमीच बाह्य गोष्टींमध्ये आनंद शोधत असतो. पण तो आपल्या हृदयात; ‘शिव-शक्ती’च्या रुपात वसलेला असतो, हे ‘अमृतानुभव’मधून तुम्हाला लक्षात येईल. अमृतानुभव ही विलक्षण आणि मोठी गोष्ट आहे. ती समजून घेण्यासाठी सखोल चिंतन, मनन, अभ्यास आणि साधना गरजेची आहे.’’ असे श्री एम यांनी सांगितले.
फोटो ः १६८१७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.