पुणे, ता. ५ : शाळेतील मधली सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थी वर्गात जात नसल्याच्या रागातून शिक्षिकेने विद्यार्थ्याला कानशिलात लगावली. यात विद्यार्थ्याच्या कानाला जखम झाली असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार केले आहेत. मात्र विद्यार्थ्याच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याने शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आईने वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना १७ सप्टेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास वाघोलीतील चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा मुलगा नेहमीप्रमाणे सकाळी साडेसातच्या सुमारास शाळेत गेला. दुपारी मधल्या सुट्टीत तो मित्रांसोबत गप्पा मारत होता. सुट्टीची वेळ संपल्यानंतर शिक्षिकेने मुलांना वर्गात जाण्यास सांगितले. मात्र, मुले ऐकत नसल्याच्या रागातून शिक्षिकेने तक्रारदारांच्या मुलाच्या गालावर व दोन्ही कानाखाली हाताने मारले. तक्रारदारांनी दुसऱ्या दिवशी मुलाला ससून रुग्णालयात उपचारासाठी नेले; तसेच वैद्यकीय-कायदेशीर प्रमाणपत्र घेतले. मात्र, मुलाच्या कानातील वेदना कमी झाल्या नसून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
विद्यार्थ्याला शाळेतून काढले
शिक्षिकेने मारहाण केल्यानंतर संतापलेल्या पालकांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. त्यावर मुख्याध्यापकांनी पालकांनाच धारेवर धरले. ‘तुम्ही आम्हाला न विचारता पोलिसांकडे का गेला; तसेच मुलाची वैद्यकीय तपासणी का केली,’ असे म्हणून मुलाला शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर २२ सप्टेंबरला विद्यार्थ्याला शाळेतून काढल्याचे ई-मेलद्वारे कळविले; तसेच दुसऱ्या दिवशी शाळा सोडल्याचा दाखलाही जबरदस्तीने दिला, असा आरोप पालकांनी केला आहे.
शिक्षिकेने केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हे कृत्य बीएनएसच्या कलम ११५, ११७ आणि १३१ नुसार शिक्षेस पात्र आहे. ११५ कलमानुसार एक वर्ष तर कलम ११७ नुसार गुन्हा दाखल असेल तर ७ वर्षे अथवा १० वर्षे ते जन्मठेपेची (इजा झालेल्या तीव्रतेवर) शिक्षा आहे. तसेच विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकल्यामुळे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १६ प्रमाणे शाळा कारवाईस प्राप्त आहे. मात्र या तीनही कलमांनुसार कारवाई केलेली नाही.
- ॲड. अविनाश आव्हाड, मुळ फिर्यादी यांचे वकील
शाळेवर होवू शकते कारवार्इ
विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकल्यामुळे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १६ प्रमाणे शाळा कारवाईस असते. मात्र या गुन्ह्यात कलम १६ चा समावेश केलेला नाही. त्यामुळे शाळेवर कारवार्इ होणार नाही. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शाळेवर कारवाई व्हायला हवी, ॲड. आव्हाड यांनी नमूद केले.
या कलमांनुसार गुन्हा दाखल
कलम - शिक्षा
बीएनएस ११५ (२) - एक वर्ष कारावास
पोक्सो - ७५ व ८२ - ५ ते १० वर्षे कारावास
तुमचे मत मांडा..
विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणात शिक्षण देण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. मात्र राग आवरता न आल्याने विद्यार्थ्याला मारहाण करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक विकासावरही परिणाम होऊ शकतो. याबाबत तुमचे मत मांडा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.