पुणे - लॉकडाउन शिथिलतेनंतर उद्योगांची उत्पादन क्षमता ५५ टक्क्यांवर, तर मनुष्यबळ उपस्थितीचे प्रमाण ६७ टक्क्यांपर्यंत पोचले आहे, असे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने (एमसीसीआयए) केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. उद्योगांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी ३ ते ९ महिन्यांचा कालावधी लागेल, असे ५५ टक्के उद्योगांचे म्हणणे आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लॉकडाउनमध्ये उद्योगांच्या स्थितीबाबत सहाव्यांदा सर्वेक्षण केले आहे. त्यात पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील १५० उद्योगांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. त्यातून उत्पादन क्षेत्राची परिस्थिती ऑगस्टच्या तुलनेत काही प्रमाणात सुधारली असून मनुष्यबळाची उपलब्धता वाढल्याचे दिसून आले आहे. या उद्योगांत सूक्ष्म आणि लघु उद्योगांचे प्रत्येकी प्रमाण ३३ टक्के, तर मध्यम आणि मोठ्या उद्योगांचे प्रमाण प्रत्येकी १७ टक्के आहे. उत्पादन क्षेत्रातील ६३ टक्के, सेवा क्षेत्रातील २४ टक्के तर, दोन्ही क्षेत्रांत कार्यरत असलेल्या १३ टक्के उद्योगांचा त्यात समावेश आहे.
जुलै महिन्यात उद्योग सुरू झाल्यावर कोरोनाच्या पूर्वीच्या काळाशी तुलना केली असता, उत्पादन आणि मनुष्यबळाची उपलब्धता या दोन्हींवर विपरीत परिणाम झाला होता असे दिसून आले. मात्र, त्यानंतरच्या दोन महिन्यांत परिस्थितीत थोडीफार सुधारणा झाली आहे. कोरोनाच्या पूर्वीच्या काळासारखी उद्योगांची स्थिती होण्यासाठी ३ ते ९ महिन्यांचा कालावधी लागेल, असे ५५ टक्के उद्योजकांचे म्हणणे आहे तर, पुढील तीन महिन्यांत उद्योगांच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा २२ टक्के उद्योगांना आहे. २४ टक्के उद्योगांनी या परिस्थितीमध्ये कधी सुधारणा होईल, यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.
सूक्ष्म उद्योग अडचणीतच
देशात सुमारे ६ कोटी ३० लाख सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांची संख्या आहे. त्यातील ८० टक्के उद्योग सूक्ष्म आहेत. ज्या उद्योगांत एक कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक आहे आणि ज्यांची उलाढाल पाच कोटींपेक्षा कमी आहे, अशा उद्योगांना सूक्ष्म उद्योग म्हटले जाते. त्यांची परिस्थिती गंभीर असल्याचेच दिसून आले आहे. पिशव्या, उदबत्ती, खडू, तसेच यंत्रांचे छोटे सुटे भाग, प्लॅस्टिकच्या खुर्च्या तयार करणे आदींचा समावेश या उद्योगांत होतो. तुलनेने अन्य उद्योगांना मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा होतो. त्यामुळे त्यांची परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे. परंतु, सूक्ष्म उद्योगांपुढे वित्त पुरवठा ही अडचण असल्याने त्यांची परिस्थिती सुधारण्यावर मोठी मर्यादा आली असल्याचे चेंबरच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
उत्पादन आणि मनुष्यबळाची उपलब्धता वाढत आहे. उद्योगांना चांगली परिस्थिती निर्माण होण्यासाठी वर्षअखेर उजाडेल असे वाटते. परंतु कोरोनाची तीव्रता वाढल्यास मार्चपर्यंत कालावधी लागेल.
- सुधीर मेहता, अध्यक्ष, एमसीसीआयए
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.