अनुभूती (‘अनुभूती ज्ञान आणि संशोधन संस्था’) हा समुदाय शिक्षणाचा प्रयोग आहे. समुदाय याचा अर्थ समान धोरणासाठी समान विचाराने एकत्रित आलेल्या लोकांचा समूह. कोणतंही ज्ञान मिळवायचं असेल तर पंचेंद्रियांद्वारे घेतलेले अनुभव आणि त्याचबरोबर शिकणाऱ्या प्रत्येकाची गती-आवड-क्षमता हेही महत्त्वाचं. हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपला शिकण्याचा मार्ग निवडला तर कदाचित अधिक चांगल्या प्रकारे ती व्यक्ती शिकू शकते. हे मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही लागू ठरतं. (sakal Marathi Editorial Article)
शिक्षण ही मुळातच सामाजिक प्रक्रिया आहे; ती केवळ शाळेच्या व्यवस्थेमध्ये होणारी नाही. याचा अर्थ शाळा कमी महत्त्वाच्या आहेत असा अजिबात नाही, पण शाळा हेच शिक्षणाचं एकमेव केंद्र ठरावं असंही नाही. शाळा आणि समाज यांनी मुलांच्या शिक्षणासाठी पूरक स्वरूपात काम करायला हवं, असं पुण्यातील या संस्थेने ठरविलं. या प्रकारची व्यवस्था मुलं ज्या भागात राहतात, त्या भागातील छोटा समाजगट एकत्र येऊन उभी करता येऊ शकते.
त्या भागातली मुलं एकत्र येण्यासाठी कोणीतरी जाणकार व्यक्ती पुढाकार घेतील, मुलांसोबत काम करण्यासाठी आवश्यक ते कौशल्य आत्मसात करतील. त्यांचं आणि भोवतालच्या लोकांचं अनुभवसिद्ध ज्ञान मुलांच्या शिक्षणासाठी वापरतील. पुस्तकं आणि प्रत्यक्ष अनुभव या दोन्हीची सांगड घालण्यासाठी या प्रकारच्या पर्यायाचा विचार महत्त्वाचा ठरतो. शिक्षण म्हणजे काय हे समजावून घेऊन पालक आणि मुलांनी एकत्रितपणे पुढे जावं. त्यासाठी आवश्यक ते बदल स्वत:त करावेत. समाज-निसर्ग-पर्यावरण या सगळ्यांशी स्वत:ला जोडून घ्यावं.
म्हणूनच ‘अनुभूती’मधील मुलं आणि पालक भोवतालची माती-झाडं-प्राणी-पक्षी यांत रमलेले दिसतात. शिक्षण केवळ विशिष्ट विषयांपुरतं मर्यादित नसतं, त्याला जीवनाचे विविध आयाम जोडलेले असतात, असायला हवेत. शिक्षण केवळ जगण्याच्या किंवा वैयक्तिक श्रीमंतीच्या प्रश्नाभोवती उभं राहता कामा नये. समाजातील विविध प्रश्न व त्यांना उपयोगी ठरू शकणारी पर्यायी उत्तरं याकडे शिक्षणाने घेऊन जायला हवं. म्हणून प्रत्यक्ष जीवनानुभव ‘अनुभूती’ महत्त्वाचा मानते.
स्वयंशिक्षण – अनुभूतीमध्ये प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या अभ्यासक्रमाची रचना स्वत: करते. त्यासाठी आवश्यक तो अभ्यास करणं, इतरांकडून मदत घेणं आणि मूल्यमापन करणं हेही प्रत्येकजण करतो. प्रत्येक जण शिकणारा - वर्ग-इयत्ता-शिक्षक-विद्यार्थी अशी कोणतीच रचना इथे नाही. कोणीही लहान–मोठं नाही. त्यामुळे एकमेकांच्या क्षमता लक्षात घेऊन सगळे जण काम करतात. केवळ उणीवा न दाखवता एकमेकांना मदत करतात. आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगाने शिकवणारा आणि शिकणारा हे भेदच संपवलेले आहेत.
आपल्याला जे माहिती आहे त्याचा अभिमान बाळगण्यापेक्षा शिकण्यासारखं खूप शिल्लक आहे, याची जाणीव हा काळ सातत्याने करून देतो. मोठे आणि मुलं एकत्रितपणे शिकत पुढे गेले तर एकमेकांसाठी अनुभवांची नवी दालनं उभी राहतात. समुदाय म्हणून पुढे जाताना बहुमतापेक्षा सर्वांनी एकमताने काम करणे यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. दुसऱ्यचं म्हणणं समजून घेऊन, मतैक्य करून, सर्वांनी पुढे जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात.
उत्पादक श्रम- बौद्धिक काम आणि शारीरिक श्रम यांच्या एकत्रीकरणातून मनुष्य चांगला विकास घडवू शकतो, हे गेल्या काही वर्षात लक्षात यायला लागलं आणि त्यामुळे उत्पादक श्रमांना पुन्हा एकदा महत्त्व आलेलं आहे. अनुभूतीत सर्व कामं पालक आणि मुलं मिळून करतात. सर्वजण मिळून शेती करतात. बांधकाम- दुरुस्त्या करतात. स्वच्छता करतात. स्वयंपाक करतात, संगीतापासून ते प्रोग्रामिंगपर्यंत सर्व शिकतात.
या सर्वांची सांधेजोड करतात. प्रत्येक कामासाठी आवश्यक ते ज्ञान आणि कौशल्य शिकून घेतात. काही पालक एकत्र येऊन या प्रकारच्या शिक्षणाचा प्रयोग करत आहेत. समाजातल्या इतरांनी इथे यावं, हे समजून घ्यावं आपल्या पातळीवर हा प्रयोग कशा प्रकारे करता येईल, त्याचा विचार करावा आणि तो त्याप्रमाणे उतरवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.