family sakal
संपादकीय

कुटुंब डॉट कॉम : स्त्री सिंहीण होईल!

उद्या आहे ता. १५ मे. हा दिवस ‘जागतिक कुटुंब दिन’ म्हणून साजरा केला जातो. सामाजिक स्वास्थ्य, सुरक्षितता, नव्या पिढीचं संगोपन - यासाठी असणारं ‘कुटुंबाचं’ महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा होतो.

शिवराज गोर्ले

उद्या आहे ता. १५ मे. हा दिवस ‘जागतिक कुटुंब दिन’ म्हणून साजरा केला जातो. सामाजिक स्वास्थ्य, सुरक्षितता, नव्या पिढीचं संगोपन - यासाठी असणारं ‘कुटुंबाचं’ महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा होतो.

उद्या आहे ता. १५ मे. हा दिवस ‘जागतिक कुटुंब दिन’ म्हणून साजरा केला जातो. सामाजिक स्वास्थ्य, सुरक्षितता, नव्या पिढीचं संगोपन - यासाठी असणारं ‘कुटुंबाचं’ महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. आजच्या काळात ते अतिशय आवश्यक झालं आहे. कारण जगभरात आज कुटुंब संस्था विस्कळित होताना दिसते आहे. या परिस्थितीत आपली भारतीय कुटुंबपद्धती जगासाठी दिशादर्शक ठरू शकते काय? होय, ठरू शकते. असा एक विचारप्रवाह आहे. भारतीय कुटुंबव्यवस्था ‘आदर्श’ आहे, कारण तिला आपल्या संस्कृतीत ‘आदर्श’ मानल्या गेलेल्या ‘पातिव्रत्य’ आणि ‘मातृत्व’ या संकल्पनांचा भक्कम आधार आहे, असं या मंडळींचं प्रतिपादन असतं. पण त्याच वेळी नेमक्या याच संकल्पनांमुळे स्त्रीची कोंडी होत असते, असाही काहींचा (विशेषतः स्त्री अभ्यासकांचा) आक्षेप असतो. त्यांच्या मते- या संकल्पनांमध्ये स्त्रीचा विचार ‘पत्नी’ व ‘माता’ म्हणूनच केला जातो. तिला ‘व्यक्ती’ किंवा ‘माणूस’ म्हणून विचारात घेतलं जात नाही. त्यामुळेच तिला स्वतंत्र अस्तित्व व विकासाची संधी नाकारली जाते. अशा या दोन बाजू तर आहेतच पण या दोन्ही बाजूंतील अभिनिवेश टाळून काही समतोल विचार करता येईल का? नक्कीच करता येईल. कित्येक वर्षांपूर्वी खुद्द स्वामी विवेकानंद यांनी या संदर्भात मांडलेले समतोल व आधुनिक विचार काहीसे थक्कच करणारे आहेत. ‘वसुधैव कुटुंबकम’ मानणाऱ्या भारतीय संस्कृतीचे पाईक असणाऱ्या, ‘बंधूंनो आणि भगिनींनो’ या दोनच शब्दांनी सर्वधर्मियांची मनं जिंकणाऱ्या स्वामीजींच्या बहुमोल विचारांना- उद्याच्या ‘जागतिक कुटुंब दिना’च्या निमित्तानं उजाळा देऊ या...

भारतीय प्राचीन संस्कृतीचा आणि हिंदू धर्माचा अभिमान असणारे स्वामीजी म्हणतात, ‘‘स्त्री शब्द उच्चारताच हिंदूंच्या मनात मातृभावाचा उदय होतो. भारतीयांच्या दृष्टीनं सारी ‘स्त्री शक्ती’ मातृत्वात घनीभूत झालेली असते, तर पाश्चात्यांच्या दृष्टीनं ती ‘पत्नीत्वा’त केंद्रीभूत झाली आहे. अर्थात मातृत्वासाठी विवाह आवश्यक आहे. पण पाश्चात्य लोक विवाहाकडे एक कायदेशीर बंधन म्हणून पाहतात. भारतीयांच्या दृष्टीनं स्त्री-पुरुषांचा अनंत काळचा संबंध साधून देणारा एक संस्कार म्हणजे विवाह. सीता, सावित्रींच्या पुण्यक्षेत्र भारतात आढळणारं स्त्रियांचं चारित्र्य मला पृथ्वीच्या पाठीवर कुठंही दिसलं नाही. भारतीय समाजात स्त्रियांबद्दलची जी आदराची, श्रद्धेची भावना आहे, तिलाही या जगात अन्यत्र कुठेही तोड नाही. विशेष म्हणजे भारतीय स्त्रीचं मुक्तकंठानं गुणगान करणारे स्वामीजी, अमेरिकन स्त्रियांचं कौतुक करण्यातही कसलीच कुचराई दाखवत नाहीत. दूर देशातून एक ‘परिव्राजक’ म्हणून आलेल्या आपल्यासारख्या निष्कांचन व्यक्तीला अमेरिकन स्त्रियांनीच उदार मनानं आश्रय दिला, पुत्रवत प्रेम व भावासारखी माया दिली, याचा अत्यंत कृतज्ञतेनं उल्लेख करून स्वामीजी म्हणतात, ‘‘अमेरिकेतील स्त्रियांकडे पाहून माझी मती गुंग होऊन जाते. किती स्वतंत्र बाण्याच्या असतात त्या. त्या नोकरी करतात, दुकानं चालवतात, कॉलेजात जातात, प्राध्यापक म्हणून शिकवतात. भय, भीती या गोष्टी मुळी त्यांच्या गावीच नसतात. आमच्या हतभागी देशात मात्र मुलींना रस्त्यानं चालायची देखील चोरी असते. भारतात पती-पत्नींनी एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटत राहणं ही गोष्ट अयोग्य लेखली जाते. पाश्चात्यांकडून ही गोष्ट आपल्याला घ्यावी लागेल... पण त्याच वेळी मातृभक्तीचा काही अंश त्यांनीही ग्रहण करणं योग्य ठरेल.’

प्रेम, मृदुता, समता, प्रत्यक्ष व्यवहारात उतरवण्याचा साऱ्या जगाचा प्रयत्न असला तरी देश-काल-पात्रभेदानुसार नीती व रिती बदलत असतात. इकडे लक्ष वेधून स्वामीजी स्पष्ट करतात की काही ना काही दोष प्रत्येक समाजात असतातच. नेमक्या याच भूमिकेतून स्वामीजी भारतातील स्त्री-पुरुष भेद व बालविवाहासारख्या प्रथांवर कडाडून टीका करतात व त्याच वेळी स्वातंत्र्याचा डिंडिम सतत झडत असणाऱ्या अमेरिकेत असंतुष्ट संसार व अयशस्वी विवाह - याची संख्या एवढी प्रचंड का असावी, हाही प्रश्न उपस्थित करतात. पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर उपाय म्हणून स्वामीजी कुठलेही ‘आदर्श’ लादण्याचा मार्ग सुचवीत नाहीत. ते मार्ग सुचवतात तो शिक्षणाचा, स्वातंत्र्याचा आणि स्वयंनिर्णयाचा! ‘‘स्वातंत्र्य हेच उन्नतीसाठी आवश्यक असतं,’’ स्वामीजी म्हणतात, ‘विचारांचं तसंच आचारांचंही. अट फक्त एकच. त्यामुळे कोणाचं अनिष्ट होता कामा नये. समाजातील सर्व स्त्री पुरुषांना शिक्षण देणं हेच समाजाचं कर्तव्य आहे. साऱ्यांना शिक्षण द्या आणि स्वतःसाठी चांगलं काय, वाईट काय हे त्यांचं त्यांनाच ठरवू द्या. जेव्हा तुम्ही स्वातंत्र्य हिरावून घेता, एखाद्याला ‘सिंह’ होण्याची मुभा नाकारता, तेव्हा तो धूर्त कोल्हा होतो,’ हे स्पष्ट करून स्वामीजी म्हणतात, ‘‘स्त्री ही खरी शक्तिस्वरूपिणी आहे. पण पुरुष तिच्यावर मर्यादा घालीत आहे, अन्याय करीत आहे. त्यामुळेच ती कोल्ह्याप्रमाणे (धूर्त) होऊ पाहते आहे. मात्र तिला जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा ती सिंहीण होईल, यात शंकाच नाही.’

स्त्रियांना... अगदी सर्वच स्त्रियांना शिक्षण देऊ या, स्वातंत्र्य देऊ या. उद्याची कुटुंबं ही केवळ ‘गृहिणीं’ची नव्हे तर ‘सिंहीणीं’ची असतील, अशी अपेक्षा करूया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक, मुद्देमाल जप्त

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT